धुळे : मुंबईसह राज्यातील शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार या महिन्यातही अजून झालेले नाहीत. फेब्रुवारी पेड इन मार्चचे पगार तब्बल एक महिन्याने मिळाले, तर मार्च पेड इन एप्रिलचे पगार दुसरा आठवडा उजाडला तरी अद्याप झालेले नाहीत. केवळ शिक्षण विभागातील दिरंगाईमुळेच हे घडत असल्याचे वित्त विभागाकडून सांगण्यात येत आहे.
कोविडमुळे निधी वितरण दर महिन्याला मागणीनुसार होत आहे. पगाराची सर्व रक्कम खात्याने वेळीच मागितली पाहिजे. मात्र, शिक्षण विभागाकडून असे होताना दिसत नाही. परिणामी त्याचा भुर्दंड शिक्षकांना सहन करावा लागतो, अशी तक्रार शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी केली आहे.
पगार उशिरा झाल्यामुळे गृह कर्जाचे हप्ते, इतर हप्ते आणि दैनंदिन खर्च भागवणे मुश्किल होते. तसेच हप्ते चुकल्यामुळे दंड सहन करावा लागतो, असेही मोरे यांनी म्हटले आहे.
याबाबत आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना पत्र पाठवले आहे.
शिक्षण विभागाचे सचिवालय राज्यातील शिक्षक, शिक्षकेतरांच्या पगाराबाबतीत गंभीर नसल्यामुळेच दर महिन्याला पगार उशिरा होत आहे, असा आरोप आमदार कपिल पाटील यांनी पत्रात केला आहे.
मुंबईतील शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार युनियन बँकेतून करण्याबाबत सुप्रिम कोर्टाच्या आदेशाची अमंलबजावणी अद्याप झालेली नाही. दोन वर्ष होऊनही करारनामा पुनर्स्थापित करण्यात आलेला नाही. त्यामुळे युनियन बँकेला पगार वितरणामध्ये अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, असेही कपिल पाटील यांनी पत्रात म्हटले आहे, अशी माहिती शिक्षक भारती संघटनेचे राज्य संघटक सचिव अशपाक खाटीक, धुळे जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी दिली आहे.