पिंपळनेरकडून सामोडे गावाकडे जात असता चौफुलीपासून काही अंतरावरच मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून कांद्याने भरलेले ट्रॅक्टर, मालाने भरलेली ट्रक दररोज होत असणारी जड अवजड वाहनांची वाहतूक, त्यात मोटारसायकल चालकांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे, तसेच पंचमुखी कॉर्नर येथे मोठमोठी खड्डे असल्याने दोन दिवसांपूर्वीच मोटारसायकल चालत खड्डे चुकवत जात असता खड्ड्यात अचानक गाडी स्लीप झाली समोरून ट्राला गाडीने जोरात ब्रेक मारला. सुदैवाने यात मोटारचालक बचावला असला तरी खड्डे कधी बुजणार, संबंधित विभाग अपघात झाल्यानंतर खड्डे बुजवणार का, अशा संतप्त प्रतिक्रिया वाहनचालक व्यक्त करीत आहेत, तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींनी विचारणा करून हा प्रश्न सोडविण्याची गरज आहे. स्टेट बँक ते बसस्थानक परिसरात अनेक वर्षांपासून खड्डेच खड्डे असल्याने त्याची ही दुरुस्ती होताना दिसत नाही. या परिसरात मोठी वर्दळ असते. छोटे-मोठे अपघात होऊन अनेक व्यक्तींना अपघात होऊन जीव गमवा लागला आहे, सटाणा रोडावरील संगम हॉटेलसमोर अनेक दिवसांपासून नाल्यात पाईप टाकण्याचे काम बंद पडले आहेत, हवेमुळे लावलेले पत्रे उडून जातात. तक्रार करूनदेखील संबंधित सुपरवायझर लक्ष देत नाहीत, अशी तक्रार राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष दीपक धायबर यांनी संबंधित विभागाकडे तक्रार केली आहे तर अपर तहसीलदार यांना निवेदन देऊन रस्त्याच्या कामाची तक्रार करणार आहेत, रस्त्यावरील खड्डे यांचा आकार दिवसेंदिवस वाढत असता परिस्थिती खड्ड्यांची जैसे थेच आहे. वाहनचालक व नागरिक संबंधित विभागावर संतप्त भावना व्यक्त करीत आहेत तर लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
विंचूर प्रकाशा हा राष्ट्रीय महामार्ग पिंपळनेर गावातून जातो. आधी हा राज्यमार्ग असल्याने बीओटी तत्त्वावर या रस्त्याचे काम सुरू होते. वेळोवेळी रस्त्याची दुरुस्ती होत होती. आता हा राष्ट्रीय महामार्ग आहे. पिंपळनेर-ताराहाबाद हा रस्ता पूर्ण खोदून ठेवला असल्याने रस्त्याचे काम बंद आहे. पूर्ण कच्चा रस्ता असल्याने वाहनचालकांना मनस्ताप होत आहे, तर ताराहाबादपर्यंत जाण्यासाठी एक तास लागतो. सततच्या पावसाने या महामार्गाची अक्षरश: चालणे मुश्कील झाले आहे. खड्ड्यांमुळे रस्ता शोधणे मुश्कील झाले आहे तर रात्री, दिवसा रस्त्यावर खड्डे असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिंपळनेर सटाणा व पिंपळनेर दहीवेल या रोडवरून अवजड वाहनांची वाहतूक होत असते तसेच पाऊस पडत असल्याने खड्ड्यांमध्ये पाणी भरून जात असल्याने छोट्या वाहनचालकांना वाहन चालवणे जिकिरीचे होते. धुळीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे, काही वाहनेही जमिनीला टेकली जातात, अशी परिस्थिती असताना संबंधित विभाग याकडे लक्ष देताना दिसत नाही. भविष्यात खड्ड्यामुळे अपघात झाल्यास याची जबाबदारी कोण घेणार, असे प्रश्न नागरिक विचारत आहेत. सदर रस्त्याची मालकी सध्या एमएसआरडीसी नाशिक विभागाकडे असल्याचे समजते. तरी संबंधित रस्त्याची परिस्थिती पाहता स्थानिक लोकप्रतिनिधींनी या गावाच्या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे. वाहतुकीस मोठी अडचण येत आहे. खड्डे टाळून वाहतूक करताना अपघात होण्याची शक्यता आहे. अत्यंत महत्त्वाचा महामार्ग असूनही त्याकडे दुर्लक्ष का, असा प्रश्न निर्माण होत आहे.