जिल्ह्यातील १४ खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यात अनेक निकष घालून देण्यात आले आहेत. शिवाय शासकीय दर ठरवून देण्यात आले तसेच ८० टक्के खाटा या शासकीय दरानुसार, तर २० टक्के खाटा या खासगी दरानुसार बंधनकारक केल्या आहेत. मात्र, शहरातील काही रुग्णालयांच्या अटी मात्र सामान्यांच्या आवाक्याबाहेरच असल्याचे चित्र आहे. तर कोरोनाबाधित रुग्ण उपचारासाठी दाखल होण्यापूर्वी ॲडव्हान्स भरण्याची सक्ती केली जाते. याशिवाय काही खासगी रुग्णालयाकडून शासकीय नियमांचे उल्लंघन करून वाढील बिल आकारण्याचा प्रकार नुकताच मनपाच प्रशासनाने उघडीस आणल्यानंतर संबधित रुग्णांच्या नातेवाईकांना वाढीव रकमेतून पैसे परत करण्याचे आदेश रुग्णालयांना देण्यात आले होते. शासनाने ॲडव्हान्स भरण्याची सक्ती करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याची अपेक्षा नातेवाईकांकडून केली जात आहे.
बेड मिळत नसल्याने चित्र गंभीर
जिल्ह्यात गंभीर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, अनेक वेळा खासगी रुग्णालयांतही बेड उपलब्ध होत नसल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. यात शासकीय यंत्रणेतील बेडही कमी पडत असल्याचे चित्र असताना पैसे मोजूनही रुग्णांना बेड मिळत नसल्याने मध्यंतरी गंभीर स्थिती निर्माण झाली होती.
माझ्या परिवारातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली. अनेक खासगी रुग्णालयांत फिरलो. मात्र बेड मिळत नव्हता. बेड मिळाला तर आधी पैसे भरण्याची मागणी केली. त्यानंतर उपचार सुरू केला. त्यामुळे खूप अडचणींचा सामना करावा लागला.
-नातेवाईक