सरकारी रेखाकला परीक्षा (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) राज्यात व राज्याबाहेर विविध केंद्रांवर घेण्यात येत असतात. अनेक विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ठ होत असतात. मात्र, राज्यातील कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने यंदा ही परीक्षा होणार नाही.
क्रीडा क्षेत्रासोबतच चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेचा उपयोग भविष्याच्या प्रगतीसाठी व्हावा, या उद्देशाने दहावीच्या परीक्षेमध्ये अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय २०१७ रोजी शिक्षण विभागाने घेतला होता. या निर्णयाचा विद्यार्थ्यांना फायदा होत हाेता. मात्र, यावर्षी परीक्षाच नसल्याने विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळणे अवघड झालेले आहे. कोरोनामुळे आधीच विद्यार्थ्यांची गुणाबाबतची धास्ती वाढलेली असताना त्यांच्या हक्काच्या सवलतीच्या गुणांवर गदा आणणे हा विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याचे अनेक संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही असा निर्णय घ्यावा.
कला संचालकांची कला शाखेच्या विद्यार्थ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक आहे. म्हणून त्यांनी कला गुण देऊ नये असे तंत्रशिक्षण विभागाला खोटी माहिती दिली. त्यामुळेच कलागुण देऊ नये असा अध्यादेश निघाला.
- प्रल्हाद साळुंके,,
प्रदेश सरचिटणीस, कला शिक्षक महासंघ.
कला संचालकांचा आठमुठेपणा हा कला क्षेत्र व कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना घातक ठरत आहे. एलिमेंटरी, इंटरमीजिएट परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना कलागुण देण्यात येऊ नये हा चुकीचा निर्णय आहे.
- सुनील महाले,
ज्येष्ठ सल्लागार, कला शिक्षक महासंघ.
कला गुणांचा विद्यार्थ्यांना फायदा होत असतो. शासनाने परीक्षा तोंडावर आलेली असताना कलागुण न देण्याचा निर्णय घेतला. तो चुकीचा आहे.
- शरद पाटील
विद्यार्थी हिताचा विचार करून शासनाने हा निर्णय रद्द करावा. तसेच पूर्वीप्रमाणेच विद्यार्थ्यांना गुण देण्यात यावे. याचा फायदा विद्यार्थ्यांना होत असतो. चुकीचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान करू नये.
- सोनाली शिंदे.