निजामपूर -निजामपूर आणि जैताणे येथे यंदा गणेशोत्सवाचे सार्वजनिक स्वरूप पार लोपले असून, त्यासाठीचा उत्साहदेखील संपलेला दिसत आहे. एकाही सार्वजनिक गणेश मंडळाने सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून उत्सव साजरा करण्यासाठी पँडॉल उभारलेला नाही. घराघरांत गणेश स्थापना झाली आहे. गावात गणेशोत्सव आहे किंवा नाही अशी शांत स्थिती कोरोनाने निर्माण केली आहे.
दरवर्षी निजामपूर येथे १२ आणि जैताणे येथे १३ सार्वजनिक गणेश मंडळे गणेशाची स्थापना करतात. गणेशोत्सवाचा उत्साह अवर्णनीय असतो. गणरायाची भव्य मूर्ती बसविण्याकरिता चढाओढ लागते. नवनवीन डेकोरेशन, रोषणाई करण्यावर भर असतो. रात्री सर्व मंडळांचे गणपती व डेकोरेशन पाहण्यास गर्दीने वातावरण फुललेले असते.
त्यानंतर विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी गावोगावीहून ढोल-ताशे, महागडे डीजे, लेझीम, कसरती, भजनी मंडळे आणण्याचे कमी मंडळे आधीपासून नियोजन करीत. ते सारे यंदा थांबले आहे. स्थापना मिरवणूक आणि विसर्जन मिरवणूक काढता येणार नसल्याच्या सक्त सूचना पोलीस प्रशासनाने दिल्या आहेत. परवानगी घेतलेल्या आणि परवानगी न घेतलेल्या ३५ मंडळांना १४९ च्या नोटिसा बजावल्या असल्याचे एपीआय श्रीकांत पाटील यांनी सांगितले आहे.