दुसाणे : ५० पैशांपेक्षा कमी नजर आणेवारी लावून दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी ग्रामपंचायतीतर्फे साक्रीचे नायब तहसीलदार संदीप सोनवणे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केलेली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांसाठी यंदाचा खरीप हंगाम जणूकाही जिवावर बेतणारा ठरला आहे. जेमतेम पावसाळा, विहिरींचे होणारे कमी पाणी, पिकांवरील होणारा रोगांचा प्रादुर्भाव या सर्व गोष्टींचा फटका शेतकरीवर्गाला मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. या खरीप हंगामातील उत्पन्न जणू शून्य टक्क्यावर जाण्याच्या मार्गावर दिसत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण दिसत आहे.
या सर्व गोष्टींचा विचार करता दुसाणे सर्कलमधील बळसाने, इंदवे, हट्टी, ऐचाळे, डोंगराळे, सतमाने, कढरे, फोफादे या सर्व गावांमधील आणेवारी ही ५० पैशांपेक्षा कमी लावून, तात्काळ दुष्काळ जाहीर करावा. या वर्षाची नजर आणेवारी ४० टक्क्यांच्या खाली लावण्यात यावी व शेतकरीवर्गास त्वरित नुकसानभरपाई मिळावी. निवेदन देतेवेळी दुसाणे येथील उद्योजक सुरेश भदाणे, बळसाने येथील युवराज चव्हाण, दुसाणे ग्रामपंचायतीचे सदस्य चंद्रकांत महाले, गोटन महाले, विवेक पिंपळे यांच्यासह नाना खेडकर, अनिल ठाकरे, बबलू वाघ, भगवान भदाणे व परिसरातील सर्व शेतकरी उपस्थित होते.
230921\img-20210923-wa0008.jpg
निवेदन देतेवेळी दुसाणे ग्रामपंचायतीचे सदस्य व शेतकरी