माणकेश्वर : ग्रामीण भागात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता गावपातळीवर स्थापन करण्यात आलेल्या ग्रामस्तरीय समित्या सक्रिय करण्याची गरज आहे. या समित्यांनी काेराेनाच्या पहिल्या लाटेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली हाेती.
काेराेनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे. शहरांसाेबतच ग्रामीण भागातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. भूम तालुक्यातील माणकेश्वर येथे शंभराच्या आसपास तर पाथरूडमध्ये ७० ते ८० रुग्ण आहेत. इतर गावांतही कमी-अधिक प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. अनेकजण काेराेना टेस्ट न करता खासगी डाॅक्टरांकडून उपचार करून घेत आहेत. काेराेनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आता जाेरदार प्रयत्न हाेणे गरजेचे आहे. सर्वप्रथम गावपातळीवर स्थापन करण्यात आलेल्या ग्रामस्तरीय समित्या पुन्हा सक्रिय करणे गरजेचे आहे. या समित्यांच्या माध्यमातून गावातील प्रत्येक घराघरांत सर्वे करून आजारी असणाऱ्या रुग्णांची माहिती घेऊन त्यावर उपचाराबाबत आरोग्य विभागाला कळवणे महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या या संकटात आरोग्य विभागावर कामाचा भार अधिक असल्याने गावागावांत कॅम्प घेता येत नसले तरी गावातील आजारी व्यक्तींना शासकीय रुग्णालयात आणण्यासाठी कुटुंबातील सदस्य,ग्राम समिती सदस्य यांच्यावर जबाबदारी देता येईल. याबाबत विचार करून प्रशासनाने योग्य कारवाई करावी व लॉकडाऊनचे नियम ग्रामीण भागातही कडक लागू करावेत, अशी मागणी केली जात आहे.