राज्यात गेल्या महिनाभरापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून मंगळवारपासून नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे धास्तावलेले व्यापारी या निर्बंधांना विरोध करीत आहेत. मागील वर्षभरापासून कोरोनाने राज्यात थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने मार्च ते जूनपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केले होते. या काळात केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानेच भाजीपाला, फ्रुट, मेडिकल सुरू होते. अन्य सर्व आस्थापना सलग तीन महिने बंद होत्या. या लॉकडाऊनमुळे अनेक व्यापाऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले. बँकेचे व्याज, दुकानाचे भाडे, वीजबिल, कामगारांचा पगार देण्यातच त्यांना नाकीनऊ येत आहे. अशात पुन्हा सरकारने मिनी लॉकडाऊन जाहीर केल्याने व्यापाऱ्यांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. आम्हाला आमची दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सर्वच दुकाने उघडण्यास बिनशर्त परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:32 IST