कळंब : कळंब शहर व लगतच्या डिकसळ हद्दीतील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येचा विचार करता, उपरोक्त भागात १० ते १२ मे दरम्यान तीन दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’ जाहीर करण्यात आला आहे. कळंबच्या उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी गुरुवारी हा आदेश जारी केला आहे.
कळंब शहरात दुसऱ्या टप्प्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. याशिवाय लगतच्या डिकसळ हद्दीमध्ये प्रत्येक भागात कोरोनाग्रस्त निघाले आहेत. शहर व डिकसळ भागातील ही वाढती संख्या व यामधील मृत्यूचे प्रमाण चिंताजनक झाले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर करत विविध निर्देश देत, अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना व्यावसाय करण्यास निर्बंध घातलेले आहेत. असे असतानाही शहरात अकारण फिरणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. जीवनाश्यक वस्तूंच्या नावाखाली गर्दी केली जात आहे.
काही व्यापारी बिघडलेलल्या या स्थितीमध्ये अधिकच भर घालत आहेत. याच स्थितीत वाढती रुग्णसंख्या, मृत्यूचे प्रमाण याचा विचार करत शहरात पूर्णपणे लॉकडाऊन करावे, अशी आग्रही मागणी विविध पक्षांच्या पदाधिकारी व संघटनानी केली होती.
याच अनुषंगाने उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी कळंब शहर व लगतच्या डिकसळ हद्दीत १० ते १२ मे असा तीन दिवस जनता कर्फ्यू करण्याचा आदेश निर्गमित केला आहे.
चौकट....
केवळ बँक, मेडिकल अन् दवाखाने
आगामी १० ते १२ मे या तीन दिवसांत कळंब शहर व डिकसळ भागात जनता कर्फ्यू राहणार आहे. या दरम्यान केवळ दवाखाने, मेडिकल व बँका या अत्यावश्यक सेवा व शासकीय कार्यालय चालू राहतील. या व्यतिरिक्त सर्व अस्थापना, दुकाने बंद राहतील. अपवादात्मक स्थितीत जीवनावश्यक वस्तुंच्या सुविधेसाठी न.प.चे मुख्याधिकारी जनतेसाठी तरतूद करतील, असे आदेशात म्हटले आहे.