उमरग्यात अवैध धंदे सुरूच
उमरगा : शहरासह ग्रामीण भागातही काेराेनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. पाेलीस, महसूल विभागाकडून प्रतिबंधात्मक आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यामुळे पाेलीस यंत्रणेवर ताण आहे. त्यामुळे अवैध धंदेचालकांचे फावले आहे. निर्बंध असतानाही अनेक ढाबे बाहेरून बंद दिसत असले, तरी आतून सुरू आहेत. यासाेबतच अन्य व्यवसायांच्या बाबतीतही असेच चित्र आहे. त्यामुळे काेराेनाचा संसर्ग वाढण्याचा धाेका बळावला आहे. हा प्रकार लक्षात घेता, अवैध धंदेचालकांविरूद्ध कठाेर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उमरगेकरांतून हाेऊ लागली आहे.
बाजारातील गर्दी कमी हाेता हाेईना
उस्मानाबाद : काेराेनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन जिल्हाभरातील आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. असे असतानाही आठवडी बाजाराच्या दिवशी बाजारपेठेत गर्दी हाेत आहे. अशा गर्दीमध्ये सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझरचा विक्रेत्यांसह ग्राहकांनाही विसर पडल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत काेराेनाचा धाेका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याबाबतीत ठाेस पावले उचलण्याची गरज आता उस्मानाबादकरांतून व्यक्त केली जात आहे.
साेनारी येथे काेविड सेंटर सुरू
परंडा : तालुक्यातील साेनारी येथे भैरवनाथ काेविड केअर सेंटर गुरूवारी सुरू करण्यात आले. याचे उद्घाटन आमदार प्रा.डाॅ. तानाजी सावंत यांच्या हस्ते झाले. या ठिकाणी ५१ बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत, कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंके, जिल्हा प्रमुख गाैतम लटके, प्रतिष्ठानचे रामचंद्र घाेगरे, नवनाथ जगताप, अंगद फडतरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
आठ महिन्यांनंतर पथदिव्यांची दुरुस्ती
लाेहारा : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैक ते बस स्थानक या दरम्यानच्या रस्त्यावरील पथदिवे मागील सात ते आठ महिन्यांपासून नादुरुस्त हाेते. पथदिवे बंद असल्याने या मार्गावर अंधार असे. परिणामी, या परिसरात अधून-मधून अपघाती घटनाही घडत हाेत्या. याबाबत नागरिकांतून नाराजी व्यक्त केल्यानंतर नगरपंचायतीचे सभपती श्रीनिवास फुलसुंदर यांनी तातडीची बैठक घेऊन वायरिंग दुरुस्ती व पथदिवे बसविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करीत दिवे सुरू केले. त्यामुळे तब्बल आठ महिन्यांनंतर हा रस्ता पथदिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला आहे. याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त केले जाऊ लागले आहे.