येरमाळा - धुळे-सोलापूर हायवेवर असलेल्या चाेराखळी येथील धाराशिव साखर कारखान्याकडून उभारण्यात येत असलेल्या ऑक्सिजन निर्मिती पायलट प्रकल्पास जिल्हाधिकारी डाॅ. काैस्तुभ दिवेगाकवर यांनी गुरुवारी भेट देऊन पाहणी केली.
देशासह राज्यात कोरोना महामारीचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांची संख्याही वेगाने वाढत असल्याने दिवसागणिक ऑक्सिजनची मागणी वाढू लागली आहे. मात्र, त्यानुसार पुरवठा हाेत नाही. ही बाब लक्षात घेऊन चाेराखळी येथील धाराशिव साखर कारखान्याकडून ऑक्सिजन पायलट प्लॅन्ट उभारण्यात येत आहे. बहुदा हा राज्यातील पहिला प्लॅन्ट असावा. दरम्यान, जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगावकर यांनी गुरुवारी प्लॅन्टला भेट देऊन पाहणी केली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, पुणे मौज इंजिनिअरिंगचे धिरेन ओक, भारी यांनी प्रकल्पाबाबत संपूर्ण माहिती दिली. जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर प्रकल्प चालू करून ऑक्सिजनचा पुरवठा सुरू करावा असे सांगितले.
इथेनॉलची निर्मिती थांबून ऑक्सिजनचा प्रकल्प सुरू करण्याचे धाडस दाखवून सामाजिक बांधिलकीचे पाऊल टाकले आहे. कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्यांना लाखोंना जीवनदान देण्याचे काम अभिजित पाटील यांच्याकडून होईल, त्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी विशेष कौतुक केले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवळे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपविभागीय अधिकारी डॉ. अहिल्या गाठाळ, तहसीलदार रोहन शिंदे, मंडल अधिकारी देवानंद कांबळे, चोराखळी तलाठी श्रीकृष्ण कावळे आदी उपस्थित हाेते.