कळंब -कळंब तालुक्यातील १४ गावांत कोविड पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या दहापेक्षा अधिक आहे. त्यामुळे संबंधित गावांत १९ मे पर्यंत उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी जनता कर्फ्यू लागू केला आहे. तसे आदेशही त्यांनी निर्गमित केले आहेत.
कळंब तालुक्यातील ग्रामीण भागात आता कोरोनाने चांगलेच हातपाय पसरले आहेत. अशी गंभीर परिस्थिती असताना गावातील चौकात, पारावर ग्रामस्थांची वर्दळ कायम आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढते आहे. याची दखल घेऊन उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी ६ ते १९ मे पर्यंत तालुक्यातील १४ गावांत जनता कर्फ्यू लागू केला आहे.
या दरम्यान संबंधित गावात गटविकास अधिकारी यांनी कोरोना योद्धा पथक तयार करून त्या गावातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूचा घरपोच पुरवठा करावा. तसेच कोरोना वाॅरिअर्सची कोविड चाचणी करूनच त्यांची नेमणूक करावी असेही या आदेशात म्हटले आहे. याव्यतिरिक्त त्या गावात शासनाच्या मार्गदर्शक सूचना नुसार किराणा, औषध, दूध, शेती विषयक दुकाने चालू राहणार आहेत.
या जनता कर्फ्यू बरोबरच त्या १४ गावांत आता कलम १४४ ही लागू करण्यात आले आहे.
चौकट -
या गावात जनता कर्फ्यू
कळंब तालुक्यातील मोहा, डिकसळ, हासेगाव केज, आथर्डी, मंगरूळ, येरमाळा, शिराढोण, गोविंदपूर, कण्हेरवाडी, बोर्डा, इटकूर आवाड शिरपुरा, कोठाळवाडी, उमरा या १४ गावांत १९ मे पर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या गावातील ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या १० च्या पुढे गेल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी सांगितले.