पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सुडाचे राजकारण चालू झाले आहे. ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत. त्यांचे खून केले जात आहेत. घरांची जाळपोळ करणे, दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे, असे प्रकार घडत आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे, असा आरोप भाजपने केला. या घटनांच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बुधवारी जिल्हाभरात निदर्शने करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये होत असलेला हिंसाचार थांबविण्यात यावा, या हिंसाचारामध्ये बळी गेलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, या घटनेला जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच पीडित कुटुंबीयांना न्याय न मिळाल्यास पुढील काळात भाजपच्या वतीने तीव्र आंदोलने छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, ॲड. नितीन भोसले, राजसिंह राजेनिंबाळकर, प्रवीण पाठक, राहुल काकडे, सुजित साळुंके आदी उपस्थित होते.
बंगाल अत्याचाराचा उस्मानाबादेत निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:34 IST