लोकमत न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : वॉर रुमसाठी ज्या अधिकाऱ्यांकडे ज्या दिवसाचे काम दिले आहे ते यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी एकमेकांमध्ये चांगला समन्वय ठेवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी वॉर रुमच्या स्थापनेबाबतचे आदेश काल जारी केले असून, या संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार फड, अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, वॉर रुमचे सनियंत्रण अधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रताप काळे, आदी उपस्थित होते.
या वॉर रूमचे काम सकाळी नऊ ते रात्री नऊ यावेळेत सुरू राहील. यासाठी दोन टप्प्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत एक टीम व दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत दुसरी टीम काम करेल. या वॉर रुमचे काम करण्यासाठी नेमलेल्या वॉर रुम कामकाज अधिकाऱ्यांनी आपले प्रतिनिधी म्हणून अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करायची आहे. तसेच कामकाज अधिकाऱ्यांनीही स्वत: या कामासाठी वेळ द्यायचा आहे, असेही दिवेगावकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी डॉ. फड यांनीही मार्गदर्शन करून वॉर रुममुळे कोरोनाच्या कामाचे नियोजन करण्याबरोबरच येणाऱ्या समस्यांचेही निराकरण करण्यास मदत होईल, असे सांगितले.