(फोटो : विजय माने २५)
परंडा : तालुक्यातील खांडेश्वरवाडी पाटबंधारे प्रकल्पाच्या भरावाला मागील वर्षी भेगा पडल्याने तातडीचा उपाय म्हणून धरणाचा सांडवा फोडून व कालव्याद्वारे पाणी सोडून पूर्ण धरण रिकामे करण्यात आले होते. मात्र, गेल्या वर्षभरामध्ये या भरावाच्या दुरुस्तीचे काम हाती न घेतल्याने धरणाच्या भरावाची परिस्थिती अजूनही ‘जैसे थे’ आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून, हा अंदाज खरा ठरल्यास या पावसाळ्यात धरण फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे.
तालुक्याच्या उत्तर भागामध्ये सिंचनाचे मुख्य स्त्रोत म्हणून या धरणाकडे पाहिले जाते. धरण लाभ क्षेत्राअंतर्गत सहा हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. खंडेश्वरवाडी धरण गेल्या पावसाळ्यात पूर्णक्षमतेने भरले होते. त्यावेळी आनंदाने भारावून जाऊन या क्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठा जल्लोष केला होता. मात्र, हा जल्लोष काही काळापुरताच मर्यादित राहिला. ऐन पावसाळ्याच्या उत्तरार्धात धरणाच्या माती बंधाऱ्याला मोठमोठ्या भेगा पडल्याने धरण फुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. पाटबंधारे विभागाने संभावित धोका पाहता पोकलेन यंत्राच्या माध्यमातून सांडवा फोडून धरणातील पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता. धरण पट्ट्यातील पाण्याचा विसर्ग वाढल्याने कालवा फोडून धरण रिकामे करण्यात आले होते. धरण रिकामे झाल्याने याचा सर्वाधिक फटका लाभ पट्ट्यातील शेतकऱ्यांना बसला होता.
धरणाला शिवसेनेचे उपनेते आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांनी भेट देऊन पाहणी करत धरणाच्या माती बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, पाटबंधारे विभागाने गेल्या वर्षभरात कुठलीही हालचाल केली नाही. शेवटी १८ मार्च रोजी विश्व मराठा संघटनेच्या वतीने तहसीलदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पावसाळ्यापूर्वी भरावाच्या दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने हा विषय गांभीर्याने न घेतल्याने आजमितीला या धरणाला धोका निर्माण झाला आहे.
240721\0132img-20210721-wa0013.jpg
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर भेगा पडलेल्या ठिकाणी प्लॅस्टिक कागद अंथरूण बंधाऱ्याची सुरक्षा प्रदान करण्याचा कोविलवाना प्रयत्न संबंधीत विभागाकडून करण्यात आला आहे