तुळजापूर : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने सुरू असलेले देशभरातील आंदोलन यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात रास्ता रोको, चक्का जाम, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, ट्रॅक्टर मोर्चा यांसारखी विविध आंदोलने करून आंदोलनाची तीव्रता वाढवावी, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले.
तुळजापूर येथे राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. केंद्र सरकारच्या धोरणामुळे देशातील शेतकरी व सर्वसामान्य जनता भरडली जात असल्याचे सांगून, शेट्टी म्हणाले, चळवळीच्या माध्यमातून तरुणानी एकत्रित येऊन शेती वाचविण्यासाठी लढा उभारण्याची गरज आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी चळवळ मजबूत करण्यासाठी सभासद नोंदणी अभियान राबविण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, रविकांत तुपकर, प्रा. प्रकाश पोपळे, अमर कदम, अमोल हिप्परगे यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी केले.