उस्मानाबाद -मध्यंतरी काेराेनासंख्या घटल्यामुळे जिल्हा प्रशासनाने निर्बंध काहीअंशी शिथील केले. असे असतानाच मागील तीन दिवसांत रुग्णसंख्येत पुन्हा दुप्पटीने वाढ झाली आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत तुळजापूर, उस्मानाबाद व कळंबमध्ये रुग्णसंख्या अधिक असल्याने चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
मागील पाच-सहा दिवसांपर्यंत रुग्णसंख्या पन्नासच्या आतच राहिली. काेराेना रुग्णवाढीचा वेग काहीअंशी मंदावल्यामुळे सरकारच्या निर्देशानुसार प्रशासनाने निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले आहेत. मात्र, अनेक मंडळी काेराेनाचा संसर्ग पूर्णपणे थांबल्यासारखे वावरत आहेत. असे असतानाच मागील तीन दिवसांत काेराेनाबाधितांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. ३ जुलै राेजी ६६२ जणांचे स्वॅब तर १ हजार २२० जणांची अँटिजन टेस्ट केली हाेती. यापैकी ५२ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला हाेता. ४ जुलैला ५६८ जणांची आरटीपीसीआर व ८१० जणांची अँटिजन टेस्ट करण्यात आली असता, ५२ जण बाधित निघाले म्हणजेच ३ जुलैच्या तुलनेत कमी टेस्ट करून रुग्ण तेवढेच निघाले आणि ५ जुलैला आरटीपीसीआर ५६५ तर अँटिजन १ हजार ५९० टेस्ट केल्या असता तब्बल ९१ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. म्हणजेच मागील दाेन-तीन दिवसांच्या तुलनेत रुग्णसंख्या जवळपास दुप्पटीने वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
चाैकट...
जिल्ह्यातील आठपैकी उस्मानाबाद, तुळजापूर व कळंब तालुक्यात मागील तीन दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्या वाढत आहे. ३ जुलैला उस्मानाबाद तालुक्यात १२, ४ राेजी १७ तर ५ राेजी १७ रुग्ण आढळून आले. तुळजापुरात ३ राेजी १७, ४ राेजी ९ तर ५ राेजी १९ रुग्ण निघाले. कळंबमध्येही काही वेगळी स्थिती नाही. ३ राेजी ०३, ४ राेजी १२ तर ५ राेजी दुप्पट म्हणजेच २२ जण पाॅझिटिव्ह आले आहेत. परिणामी उपराेक्त तिन्ही तालुक्यांची चिंता वाढली आहे.