(ज्येष्ठांची संख्या ५६ यात १८ महिला, ३८ पुरूष)
गुंजोटी : आज कोरोना महामारीमुळे हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी बेडची कमतरता भासू लागल्याने ज्येष्ठांची मोठी हेळसांड होत आहे. अशा परिस्थितीत साठ प्रवेशक्षमतेचे इंद्रधनू वृध्द सेवा केंद्र मात्र ताठ मानेने कार्यरत आहे. परंतु, कोरोना काळात अभ्यागत तसेच नातेवाईकांच्या भेटीगाठी बंद झाल्यामुळे येथील ज्येष्ठांना सध्या एकाकी जीवन जगावे लागत आहे.
सन १९९३च्या महाविनाशकारी किल्लारी - सास्तूर भूकंपानंतर वाचलेल्या बालकांची जबाबदारी अनेक संस्थांनी घेतली. ज्या महिला एकाकी उरल्या त्यांच्या पुनर्वसनासाठीसुध्दा अनेकजण पुढे आले. परंतु, या विनाशकारी भूकंपानंतर वाचलेल्या एकाकी ज्येष्ठ नागरिकांचे उर्वरित आयुष्य मात्र फारच खडतर झाले. त्यांची ही अवस्था जवळून पाहिलेल्या डॉ. दामोदर पतंगे यांनी आपले उर्वरित आयुष्य ज्येष्ठांच्या कल्याणासाठी व्यतीत करण्याचा निश्चय केला आणि अल्पावधीतच आदर्शवत ठरलेल्या इंद्रधनू वृध्द सेवा केंद्राची त्यांनी निर्मिती केली. आज कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. परंतु, या वृध्दाश्रमाच्या व्यवस्थापनाकडून ज्येष्ठांची मात्र पुरेपूर काळजी घेतली जात असल्याचे दिसत आहे.
भेट देणारे शुन्यावर
या केंद्राला भेट देणारे मान्यवर आणि या भेटीचे वर्णन प्रसारमाध्यमांव्दारे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचून त्यातून देणगीदार पुढे येऊन या केंद्राला बळ मिळत असे. परंतु, कोरोनामुळे मागच्या वर्षभरापासून मान्यवर तसेच सर्वसामान्य माणसांसोबतच मान्यवर आणि अभ्यागतांच्या भेटी तर बंद झाल्याच, परंतु इथे निवासाला असणाऱ्या ज्येष्ठांचे नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या भेटीवरदेखील कोरोनामुळे संस्था प्रशासनाला निर्बंध घालावे लागत आहेत. येथील निवासी ज्येष्ठांना केंद्राबाहेर जाण्यावरही निर्बंध लादावे लागले. त्यामुळे येथील निवासी ज्येष्ठांना अत्यंत एकाकीपणा जाणवतो आहे. अनेकदा त्यांच्या चेहऱ्यावर हे दु:ख प्रकर्षाने अनुभवायला मिळते. परंतु, उत्तर सापडत नाही.
मदतीचा ओघही कमी
कोरोना काळात मान्यवरांच्या भेटीगाठी बंद झाल्यामुळे साहजिकच देणगीरूपी बळही दुर्लभ झाले. तसं म्हणायला ‘आपुलकी परिवार, नांदेड’ या ज्येष्ठ नागरिक संघाने इंद्रधनुची माहिती ऑनलाईन घेऊन एक महिन्याचे रेशन व कोरोनाकाळात आवश्यक असे पौष्टीक खाद्य ऑनलाईन पुरविले. याशिवाय, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ संस्थान, निवासी सेवानिवृत्त शिक्षिका शकुंतला शिवाजीराव कटारे यांनी येथे येऊन संस्थेला बळ दिले. परंतु, अशा संस्था फारच मोजक्या आणि त्यांच्यापर्यंत ऑनलाईन पोहोचणे हेही अवघडच.
सहकारी निवासीच माझे आप्तेष्ट...
मागील दीडेक वर्षांपासून मी एकाही नातलगास भेटू शकलो नाही. त्यामुळे माझी जीवनशैलीच पार बदलून गेली. इथले सहकारी निवासीच माझे आप्तेष्ट, असे समजून थोडाफार आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
वर्षभरात शहरात गेलोच नाही
तसं आमचं गावच उमरगा. परंतु, मागच्या वर्षभरात आम्ही शहरात गेलोच नाही. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हा निर्धार आम्ही केला. अनेकदा असे जगणे असह्य होते. परंतु, त्यावेळी आम्ही इतर सहकारी निवासी यांच्यासाठी हे आवश्यकच आहे, अशी स्वतःची समजूत घालतो.
दोन वाढदिवस आप्तेष्ठांविनाच
आम्ही मागील अठरा वर्षांपासून इथे राहतोय. संस्था प्रशासनाला अनेकवेळा आम्ही साह्य करून सहकारी निवासींचे समुपदेशन करतो आणि स्वतःलादेखील मूग गिळून गप्प बसण्यास भाग पाडतो. मी ज्येष्ठ झाल्यानंतर म्हणजे साठीनंतर प्रत्येक वाढदिवसाला नातवंडे व नातलग हमखास हजेरी लावायचे. परंतु, मागील दोन्ही वाढदिवस आप्तेष्टांविना करावे लागले.