उस्मानाबाद : वाशी तालुक्यातील झिन्नर येथील बौद्ध सरपंचास व कुटुंबास मारहाण करणाऱ्या आरोपीस तत्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डरकाळी आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
उस्मानाबाद जिल्ह्यातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष केदार जाधव यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डरकाळी आंदोलन करण्यात आले. यावेळी केदार म्हणाले, झिन्नर येथील अनुसूचित जातीची महिला सरपंच शिल्पा गरड यांना जातीयेतून त्रास दिला जात आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर सशस्त्र हल्ला झाला. यात कुटुंबातील सदस्य गंभीर जखमी आहेत. ॲट्रासिटी ॲक्टअंतर्गत नऊ आरोपी आहेत. यांतील पाच आरोपी मोकाट आहेत. त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी. कळंब तालुक्यातील घारगाव येथे गेल्या २० वर्षांपासून बौद्ध समाजातील व्यक्ती गायरान जमीन कसत आहेत. त्यांच्याकडे त्याचे पुरावे व कागदपत्रे आहेत. असे असतानाही वनविभागाने पोलिसांकरवी गायरानधारक भूमिहीनांना हाकलून देऊन जेसीबीने पीक उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी झाडे लावली आहेत. या कुटुंबाना न्याय मिळवून देण्यात यावा, अशी त्यांनी मागणी केली. यावेळी धनंजय हुंबे, अशोक कसबे, यशपाल गायकवाड, पृथ्वीराज वाघमारे, चेतन पांडागळे, आदींची उपस्थिती होती.
या आहेत मागण्या
लोहारा तालुक्यातील कानेगाव बुद्धविहार तत्काळ सुरू करून द्यावे, झिन्नर येथील बौद्ध सरपंचास व कुटुंबास मारहाण करणाऱ्या आरोपीस तत्काळ अटक करण्यात यावी, घारगाव येथील गायरान जमीन २० वर्षांपासून कसणाऱ्या कुटुंबाच्या नावे करण्यात यावी, शिराढाेण येथील अनुसूचित जातीचे माजी सैनिक भीमा गाडे यांना शासनाकडून मिळणारी जमीन तत्काळ देण्यात यावी.