उस्मानाबाद : महिला बचत गटाच्या महिलांनी दारू पकडल्याचा राग मनात धरून एका महिलेचा विनयभंग करीत मणीमंगळसूत्र हिसकावून घेतल्याप्रकरणी दारूविक्रेत्यासह सहा जणांविरूध्द शनिवारी बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना सोमवारी कनगरा (ता़उस्मानाबाद) येथे घडली. कनगरा येथील बचत गटाच्या महिलांनी अवैधरित्या दारूविक्री करणार्यांविरूध्द कारवाईची मागणी बेंबळी पोलिसांकडे केली होती़ मात्र, पोलिसांनी महिलांनीच दारू पकडून दाखवावी, अशा सूचना देत मागणीकडे दुर्लक्ष केले होते़ त्यामुळे संतप्त महिलांनी अवैधरीत्या दारूविक्री करणार्या शशीकांत राठोड याच्याकडील दारू पकडून पोलिसांना माहिती दिली होती़ मात्र, पोलिसांनी कारवाई न करता दारू सांडून दिली. तर शशीकांत राठोड याच्यासह इतरांनी एका महिलेच्या अंगावरील मणीमंगळसूत्र हिसकावून घेत तिचा विनयभंग केला़ यामुळे संतापलेल्या जमावाने पोलिस कर्मचार्यांना मारहाण केली़ या घटनेनंतर पोलिस अधीक्षक सचिन पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली कडूकर यांच्यासह आलेल्या शेकडो कर्मचार्यांनी घराचे दरवाजे तोडत ग्रामस्थांवर अमानुष लाठीहल्ला केल्याची तक्रार कनगरा ग्रामस्थांनी केली होती़ या घटनेचा राज्यभरातून तीव्र निषेध झाला़ विरोधी पक्षनेते विनोद तावडे, मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी कनगरा गावास भेट देऊन पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली कडूकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरली होती़ यानंतर सपोनि बनसोडे यांच्यासह इतर तीन कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले़ अखेर गृहमंत्री आऱआऱपाटील यांनी शुक्रवारी कनगरा गावास भेट देवून ग्रामस्थांसमोरच पोलीस अधीक्षकांची हजेरी घेतली़ यावेळी त्यांनी दोषी अधिकार्यांवर कारवाईसह गुन्हे दाखल करण्याचे आदेश देतानाच अवैध दारूविक्रेत्याविरूध्दही कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ दरम्यान, २६ मे रोजी रात्रीच्या सुमारास दारूविक्रेत्या शशीकांत राठोड याच्यासह मीनाक्षी राठोड, शोभा राठोड, वकिल्या, छायाबाई, सोनाबाई राठोड यांनी संगणमत करून एका ३० वर्षीय महिलेस शिवीगाळ केली़ यावेळी शशिकांत राठोड याने तिचा विनयभंग केला तर वकिल्या याने गळ्यातील मंगळसूत्रासह दागिने ओढून घेतले़, अशी फिर्याद पीडित महिलेने दिल्यावरून वरील सहा जणांविरूध्द बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ पोलिसांनी केलेल्या नुकसानीचे पंचनामे तालुक्यतील कनगरा येथे पोलिसांनी ग्रामस्थांवर केलेल्या अमानुष अत्याचाराबरोबरच तेथील १८ कुटुंबियाच्या घरांचे नुकसान केले असल्याचे महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यातून स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील कनगरा येथे दारूबंदीच्या कारणावरून झालेल्या वादातून सोमवारी रात्री शेकाडो पोलिसांनी ग्रामस्थांना घरात घुसून मारहाण केली होती. यात अनेकांच्या घरांचेही पोलिसांनी नुकसान केले. पंचनाम्यानुसार लतीफ पठाण यांच्या घराचा चौकटीसह दरवाजा तुटून व स्वयंपाक घरातील अन्नधान्याची नासधूस झाली आहे. लहूराज रामभाऊ गुंड, युवराज बाबू माने, भैरु गोविंद भंडारकर, विजयकुमार गोविंद भंडारकर, दादासाहेब गोविंद भंडारकर, व्यंकट हरीबा धाराव, सुरेश दगडू माने, श्रीमंत अर्जुन इंगळे, वजीर इस्माईल शेख, अभिमन्यू इंगळे, नितीन हरिदास इंगळे, बाबूलाल अंबीर शेख, संजय शंकर धस, लक्ष्मण तुळशीराम गुजरे, अरुण पल्हाद इंगळे, रामराव नाना धाराव व लालासाहेब व इकाम शेख आदींच्या घराचेही पोलिसांनी नुकसान केले आहे.
दारू विक्रेत्याविरूध्द दरोड्याचा गुन्हा
By admin | Updated: June 1, 2014 01:02 IST