पाथरूड : शासनाकडून तीन वर्षांपर्यंतच्या बालकांना तसेच गरोदर मातांसाठी दर तीन महिन्यांला अन्नधान्य, कडधान्य तेल असे विविध प्रकारचे पौष्टिक आहाराचे किट दिले जाते. यामुळे घरीच बालकांना व गरोदर मातांना पौष्टिक आहार मिळत आहे. परंतु, सध्या विशेषत: खाद्यतेलाच्या किमतीत प्रति किलो जवळपास ५० ते ७० रुपयांची वाढ झाली असल्याने या किटमधून खाद्यतेल कमी करून त्याऐवजी एक किलो साखर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मागील वर्षीच्या लॉकडाऊनपासून किराणा साहित्याच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असतानाच बालके व गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या पौष्टिक आहारावरदेखील याचा परिणाम झाल्याचे दिसत आहे. सध्या खाद्यतेलाची प्रति किलो किंमत १६० ते १८० रुपयांपर्यंत पोहोचल्याने हे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. परंतु, दररोजच्या जेवणात तेलाशिवाय पर्याय नसल्याने कमी प्रमाणात का होईना तेलाचा दररोजच्या आहारात वापर करावाच लागतो आहे. तसेच मागील महिन्यांपासून अंगणवाडीतून बालकांना व गरोदर मातांना मिळणाऱ्या पौष्टिक आहार पॅकिंग किटमधून ५०० ग्रॅम तेलाच्या पिशवी ऐवजी १ किलो साखर देण्यात येत आहे. दरम्यान, शासनाकडून गहू, तांदूळ, मसूरदाळ, चटणी, हळद, मीठ, साखर ऐवढे पौष्टिक घटक देण्यात येत असताना या सर्वांसाठी लागणारे तेलच या किटमधून वगळून साखर देण्यात येत असल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.