उस्मानाबाद : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यावतीने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पालिका प्रशासनाने एप्रिल महिन्याची वाट न पाहता जानेवारी महिन्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा सुशोभिकरणाचे काम हाती घेतल्यास ते व्यवस्थित व नियोजनबद्ध तसेच चांगल्या दर्जाचे होईल, तसेच हे काम चांगल्या पद्धतीने व्हावे, या दृष्टीने मुख्याधिकाऱ्यांनी स्वत: यात लक्ष द्यावे, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
पुतळ्याच्या सौंदर्यात आणखी भर पडण्याच्या दृष्टीने या पुतळ्यासमोर भारतीय संविधान उद्देशिकाचे प्रतीकात्मक शिल्प बसविण्यात यावे, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी रिपाइंचे शहराध्यक्ष उदयराज बनसोडे, तालुकाध्यक्ष भालचंद्र कठारे, जिल्हा संघटक सोमनाथ गायकवाड, तालुका कार्याध्यक्ष संपत जाधव, तसेच स्वराज जानराव, उमेश वाघमारे, जयपाल सुरवसे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित विभागास तत्काळ आदेश देऊन कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या अनुषंगाने सूचना दिल्याची माहिती रिपाइंच्यावतीने पत्रकाद्वारे देण्यात आली.
‘अनुकंपाधारकांना नियुक्त्या द्या’
उस्मानाबाद : जिल्ह्यातील नगर परिषदा आणि जिल्हा प्रशासनाकडून पात्र अनुकंपाधारकांची प्रतीक्षा सूची तयार करण्यात आलेली नाही. त्यामुळे रिक्त जागा असतानाही मागील अठरा वर्षांपासून नियुक्तीस टाळाटाळ होत असल्याचा आरोप जलित मित्र संघाचे राज्य सचिव तथा अधिकारी, कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष शंकर खुने यांनी केला आहे. अनुकंपाधारकांनी अनेक वेळा विनंत्या, उपोषणे केली; परंतु प्रत्येक वेळी आश्वासनाशिवाय त्यांना काहीच मिळाले नाही. त्यामुळे येत्या दहा दिवसांत पात्र अनुकंपाधारकांना नियुक्त्या द्याव्यात, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा खुने यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिला आहे.