उस्मानाबाद : येथील सुशीलादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरोधात ठेवी परत न दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. आता या पतसंस्थेत ५० हजारांच्या आतील ठेवी ठेवणाऱ्या ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याचे उपनिरीक्षक वाय. बी. खटके यांनी कळविले आहे. उस्मानाबाद येथील सुशीलादेवी नागरी सहकारी पतसंस्थेत अनेकांनी गुंतवणूक केली आहे. मात्र, मुदत संपूनही ठेवी मिळत नसल्याने काही ठेवीदारांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. याप्रकरणी संचालक मंडळावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण तपासासाठी सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले आहे. यातील आरोपी संचालक हे जामिनावर सोडण्यात आले आहेत. दरम्यान, न्यायालयाने या पतसंस्थेत ५० हजार रुपयांपर्यंत ठेवी असलेल्या ठेवीदारांना दिलासा देत त्यांची रक्कम परत देण्याचे आदेश पतसंस्थेस दिले आहेत. याअनुषंगाने आथिक गुन्हे शाखेने ठेवीदारांना आवाहन केले आहे. ५० हजार रुपयांच्या आतील तसेच ५० हजार रुपयांच्या वरील ठेवी असलेल्या ग्राहकांनी २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत संपूर्ण कागदपत्रांसह स्वत: पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेत उपस्थित राहून आपले म्हणणे सादर करावे, असे आवाहन उपनिरीक्षक वाय. बी. खटके यांनी केले आहे.
‘सुशीलादेवी’च्या ठेवीदारांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:29 IST