केंद्र सरकारने लागू केलेल्या शेतकरी विरोधी तीन काळ्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सिमेवर मागील शंभर दिवसापासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. या शेतकऱ्यांनी शुक्रवारी भारत बंदची हाक दिली होती. या बंदला पाठिंबा दर्शविण्यासाठी देशभरात काँग्रेसच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आली. उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनेही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधात तीन काळे कायदे केलेले आहेत आणि कामगारांच्या विरोधामध्ये एक कायदा केलेला आहे. तसेच सध्या देशामध्ये पेट्रोलचा शंभर रुपये आणि डिझेल ८८ रुपये प्रति लीटरप्रमाणे विकले जात आहे. इतकी प्रचंड दरवाढ झाल्यामुळे सर्वच वस्तूंचे भाव वाढले आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला आता जवळजवळ १०० दिवसांपेक्षा अधिक दिवस झालेले असताना केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने या आंदोलकांकडे दुर्लक्ष केलेले आहे. देशामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. कामगार कायद्यांमध्ये बदलामुळे आणि त्यामधील जाचक तरतुदींमुळे देशातील कामगार देशोधडीला लागणार असल्याने हे कायदे रद्द करण्यात यावेत, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली होती. यावेळी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ॲड. धीरज पाटील, अग्निवेश शिंदे, राजाभाऊ शेरखाने आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:34 IST