कळंब : तालुक्यातील ५९ गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तहसील कार्यालयातील निवडणूक विभाग सज्ज असून, उपरोक्त गावांत १९४ मतदान केंद्राचा भार तब्बल ७७६ कर्मचारी सांभाळणार आहेत.
कळंब तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींची १५ जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यासाठी गावोगावी राजकीय हालचालीने चांगलाच वेग घेतला आहे. एकीकडे गावगाड्यात बैठका, चर्चेच्या फेऱ्या अंतिम टप्प्यात आल्या असताना दुसरीकडे प्रत्यक्षात मतदान घ्यायची वेळ येणार आहे, असे गृहीत धरून प्रशासकीय पातळीवर मतदानप्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे.
यासाठी कळंब तहसील कार्यालयातील निवडणूक विभाग कार्यशील असून मतदान केंद्रावरील भौतिक सुविधांच्या उपलब्धतेपासून प्रशिक्षित मनुष्यबळ उभे करण्यासाठी नियोजन केले आहे. विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांना याकामी जुंपण्यात आले आहे.
त्यांची नियुक्ती, प्रशिक्षण कार्यवाही, नियम व निर्देशांची माहिती देणे याविषयी तालुकास्तरावर यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. तहसीलदार मंजूषा लटपटे, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार अस्लम जमादार यावर विशेष लक्ष ठेवून आहेत.
चौकट...
५९ ग्रामपंचायती
तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या ५९ ग्रामपंचायतींचे एकूण १८८ प्रभाग आहेत. यातून ४९५ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. यासाठी १८८ मतदान केंद्र व सहा सहाय्यक मतदान केंद्र राहणार आहेत. ईटकूर व येरमाळा येथील प्रत्येकी तीन प्रभागांत हे सहाय्यक मतदान केंद्र राहणार असल्याने मतदान केंद्राची संख्या १९४ राहणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्र अधिकारी व तीन मतदान अधिकारी अशी बुथवरील रचना राहणार आहे. यानुसार तालुक्यात ७७६ कर्मचारी प्रत्यक्ष केंद्रावर कार्यरत राहणार आहेत. यासाठी जि. प. शिक्षक व खाजगी संस्थांतील कर्मचारी राहणार आहेत.
१५ झोनल अधिकारी
कळंब तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पाडण्यासाठी १५ झोनल अधिकारी कार्यरत राहणार आहेत. याशिवाय २२ निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांना २२ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक मदत करत आहेत.