औरंगाबाद : पावसाने वक्रदृष्टी केल्यामुळे यंदा मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, हे अपरिहार्य नाही. केवळ अस्मानीही नाही तर त्याला सर्वस्वी आजवरचे चुकीचे धोरण अवलंबून आहे, असे राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा. एच. एम. देसरडा यांनी पत्रकारांशी बोलतानासांगितले.देसरडा म्हणाले, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राज्यातील पाणीटंचाई व दुष्काळ निर्मूलनाचा सविस्तर आराखडा सादर केला आहे. वैश्विक हवामान बदल, ऋतूचक्रातील बिघाडामुळे अवकाळी घटनांचे प्रमाण वाढत आहे. जसा रोगाचा फटका क्षीण, कुपोषणग्रस्त यांना अधिक बसतो तसेच ताण सहन करण्याचा त्रास नसलेल्या भूभाग व जनविभागांना नैसर्गिक आपत्तीचा फटका अधिक बसतो. आजवर सरकारने मराठवाड्यातील पाणी सिंचन, जलसंधारण, टंचाई निवारण, आपत्तीसाह्य, रोजगार हमी या सर्वांवर एक लक्ष कोटी खर्च केले, त्याचे काय फलित निघाले हेही तपासले पाहिजे. मराठवाड्यात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर टंचाईसदृश परिस्थिती घोषित करणे हा उपाय नाही, तर पुन्हा टंचाई किंवा दुष्काळ उद्भवणार नाही, असा संकल्प केला पाहिजे. त्यासाठी शास्त्रशुद्ध नियोजन लोक सहभागाने राबवावे यासाठी विभागातील तिन्ही विद्यापीठांच्या कुलगुरूंशी, काही महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी आपण संवाद साधत आहोत, असेही प्रा. देसरडा यांनी सांगितले.
दुष्काळाला चुकीचे धोरणच जबाबदार
By admin | Updated: August 20, 2014 00:59 IST