जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात खा. रावसाहेब दानवे यांना प्रतिनिधित्व मिळेल का, याविषयी महायुतीच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांत कमालीची उत्कंठा निर्माण झाली आहे. दानवे हे गेल्या ४० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. सरपंच, पंचायत समिती सभापती, आमदार आणि खासदार अशा एकापाठोपाठ पदांवर त्यांनी काम केलेले आहे. विशेषत: आतापर्यंत चोवीस निवडणुका लढविल्या, त्यापैकी २३ निवडणुकांत यश पटकाविले आहे. मतदारसंघासह राजकारणातील बारकावे दानवेंना चांगलेच माहिती आहेत. त्यामुळेच ते एक अनुभवी व मुरब्बी राजकारणी म्हणून या जिल्ह्यात ओळखले गेले आहेत. प्रत्येक निवडणुकीतून त्याचे प्रत्यंतर विरोधकांना आले आहे. चकवा म्हणून ते सुपरिचित राहिले आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दानवे हे २ लाख ६ हजारांच्या एवढ्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. मराठवाड्यात सर्वाधिक मतांनी विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये त्यांचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीत हॅटट्रिक केलेल्या दानवे यांनी या निवडणुकीतच विजयाचा चौकार मारला. तोही एवढ्या मोठ्या मताधिक्याने. त्यामुळेच पक्षश्रेष्ठींनी या विजयाची दखल घ्यावी, अशी अपेक्षा दानवे बाळगून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य मंत्रिमंडळात आपणास स्थान मिळावे, म्हणून दानवेंनी प्रयत्न सुरू केले आहेत. विशेषत: निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दानवेंची मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी भोकरदनच्या सभेतून घोषणा केली होती. त्याची पूर्तता व्हावी, अशी अपेक्षा दानवे समर्थकांमध्ये आहे. त्यामुळेच मोदींच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळेल, असा आशावाद समर्थक बाळगून आहेत. (प्रतिनिधी) शब्द खरा होईल ! या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, पक्षाचे माजी अध्यक्ष व राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी येथील जाहीर सभेतून रावसाहेब दानवे निवडून आल्यानंतर त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी ग्वाही जनतेला दिली होती. त्यामुळे आता गडकरींचा शब्द खरा होईल, असे कार्यकर्त्यांमधून बोलले जाते.
दानवेंच्या मंत्रिपदाबाबत कार्यकर्त्यांत उत्कंठा
By admin | Updated: May 20, 2014 01:07 IST