औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या वादळी वाऱ्याची भयानकता इतकी होती की, त्याचा फटका जिल्ह्यातील ३५८ वीज खांबांना बसला. काही खांब जमिनीवर कोसळले, तर काही वाकले. यात सर्वाधिक खांब कन्नड, पिशोर व वैजापूर या परिसरातील आहेत. परिणामी, अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. कोसळलेल्या खांबांच्या जागेवर नवीन खांब बसविणे व वाकलेल्या खांब व वाहिन्यांच्या त्वरित दुरुस्तीचे काम महावितरणने हाती घेतले आहे.मृग नक्षत्राच्या सलामीलाच ९ जून रोजी रात्री सर्वदूर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. तासभर बरसलेल्या पावसाने जीटीएल व महावितरणच्या अधिकाऱ्यांची झोप उडवून टाकली. कारण, वादळी वाऱ्यांनी लहान-मोठी झाडे कोलमोडून पडली. यातील काही झाडे विद्युत वाहिन्यांवर पडली. काही ठिकाणी विद्युत खांब खाली पडले, तर काही ठिकाणी अर्धवट वाकले. 1 ग्रामीण भागात उच्च दाब वाहिनीचा भार सांभाळणारे ७० खांब, तर लघुदाब वाहिनीचा भार पेलणारे २८८ खांब बाधित झाले. या ३५८ खांबांपैकी काही खांब उखडून पडले, तर काही खांब अर्धवट वाकले.2 यातही नुकसान झालेल्या खांबांपैकी पिशोर, कन्नड, वैजापूर या भागातील खांब अधिक आहेत. सुमारे ३८ लाख रुपयांची वीज यंत्रणेची हानी झाली आहे.3 यासंदर्भात महावितरणचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी सांगितले की, जिथे जिथे विद्युत पोल पडले आहेत तिथे नवीन पोल बसविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जे खांब वाकले आहेत ते सरळ करून उभारण्यात येणार आहेत. 4 युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसांत सर्व खांबांची उभारणी करण्यात येईल व वाहिन्याही जोडण्यात येतील.
वादळी वाऱ्याने जिल्ह्यातील ३५८ वीज खांबांना फटका
By admin | Updated: June 12, 2014 01:34 IST