औरंगाबाद : आम्ही एकसंध महाराष्ट्रवादीच असून, स्वतंत्र मराठवाडा राज्य व्हावे असे आम्हाला वाटत नाही, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे सांगितले. मराठवाड्यावर अन्याय होता कामा नये. मराठवाड्याला न्याय मिळालाच पाहिजे, मराठवाड्याचे प्रश्न सुटले पाहिजेत, असा आग्रह मात्र त्यांनी धरला. तसेच मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला; पण मुस्लिम आरक्षण वगळल्याबद्दल त्यांनी राज्य सरकारचा जाहीर निषेधही केला. सरकार जातीयवाद करीत असून हे सारे मतांचे राजकारण असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.आयआयएमला नागपूरला पळवले, जायकवाडीला समन्यायी पद्धतीने पाणी सोडले जात नाही, रेल्वेचे प्रश्न सुटत नाहीत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, अशावेळी स्वतंत्र मराठवाड्याची मागणी पुढे येत आहे. आपले मत काय असे विचारता अशोक चव्हाण उत्तरले की, आम्ही एकसंध महाराष्ट्रवादीच आहोत. मात्र, मराठवाड्याला न्याय मिळाला पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. आता आम्ही विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली वगैरे असे काही म्हणता येत नाही. पक्ष सोडून कुणी जात नाही. प्रश्न रेटून न्यावे लागतील. यासाठी पक्षातर्फे बैठका, मेळावे या माध्यमातून जनजागृती सुरूआहे.काँग्रेसचा कार्यक्रम म्हटल्यानंतर नेहमीच नियोजनाचा अभाव बघावयास मिळतो. कोण काय बोलेल, याचा नेम नसतो. आजही सुरेश जेथलिया यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा मुद्दा काढला. विधानसभा निवडणुकांमधील पराभवाचे चिंतन करा.. फार थोड्या मतांनी अनेकजण पडले आहेत, असे उद्गार काढून व दुष्काळाबद्दल फारसे न बोलता ते थांबले. गेव्ह आवारी समिती तक्रारींची छाननी करीत आहे, असे माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले. पत्रकारांशी वार्तालाप करताना अब्दुल सत्तार यांचे खटकणारे मध्ये मध्ये बोलणे चालूच होते. देवेंद्र फडणवीस सरकार आता आले. त्याआधी पृथ्वीराज चव्हाण यांचे सरकार होते. मग त्यांनी दुष्काळाबद्दल व आयआयएमबद्दल काय केले या प्रश्नाचे उत्तर देताना दोन्ही नेते एकमेकांकडे पाहायला लागले. आयआयएमबद्दल पृथ्वीराज चव्हाण सरकारने निर्णय घेतला होता, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. ४आयआयएमबद्दलचा निर्णय केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घ्यावयाचा आहे. राज्य सरकारच्या शिफारशींची गरज नाही. अजूनही केंद्र सरकार मनात आणेल, तर औरंगाबादला आयआयएम स्थापन करण्याचा निर्णय घेऊ शकते, असे चव्हाण यांचे म्हणणे पडले.
‘आम्ही एकसंध महाराष्ट्रवादीच’
By admin | Updated: January 6, 2015 01:12 IST