वाळूज महानगर : तीसगाव परिसरातील म्हाडा कॉलनीत पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याने या कॉलनीतील जवळपास २०० कुटुंबांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सिडकोकडून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने या परिसरातील नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करून टँकरचे पाणी मागवावे लागत आहे.
म्हाडा तसेच सिडको वाळूज महानगरात पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याच्या तक्रारी नागरिकांनी सिडको प्रशासनाकडे केल्या होत्या. या तक्रारीनंतर आठवडाभरापूर्वी सिडको प्रशासनाच्या वतीने सर्वत्र सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, यासाठी पाणी पुरवठ्याच्या वेळात बदल केला आहे. दरम्यान, पाणी पुरवठ्याच्या वेळात बदल केल्यानंतर पुन्हा अपुरा पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरिकांत असंतोषाचे वातावरण पसरले आहे. पूर्वी या परिसरात जवळपास एक ते सव्वा तास पाणी पुरवठा केला जात होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. यााबाबत सिडको प्रशासनाकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप आनंद दिडहाते, मनीष होले, गजानन दराडे, ज्ञानेश्वर गायकवाड, सुभाष लहाने, सागर बागूल आदींनी केला आहे.
फोटो ओळ- नवीन म्हाडा कॉलनीत दररोज असे पाण्याचे टँकर येत आहेत.