रवी गात , अंबडजालना व अंबड या दोन शहरांतील तब्बल ४ लाख ३१ हजार नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुध्दीकरण केंद्राला कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. दोन्ही शहरांतील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सुरक्षा रामभरोसे असून, जालना व अंबड पालिका प्रशासन याबाबत अनभिज्ञ आहे. लोकमतने रविवारी सकाळी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून ही बाब उघडकीस आली. सदर प्रतिनिधी संपूर्ण जलशुध्दीकरण केंद्राची पाहणी करत असताना कोणीही त्यास आत जाण्यापासून हटकले नाही. धक्कादायक बाब म्हणजे या जलशुध्दीकरण केंद्राच्या शुध्दीकरण करण्यात आलेल्या पाण्यावर पाणी माफिया डल्ला मारत असल्याचेही यावेळी आढळून आले.अनेक वर्षांच्या संघर्षानंतर जालना शहरास पाणी पुरवठा करण्यासाठी तब्बल २१० कोटी रुपये खर्चुन जायकवाडी-जालना ही योजना पूर्णत्वास आली. जालना शहरात ७ मे २०१३ रोजी आयोजित कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ही योजना कार्यान्वित झाली. सध्या जायकवाडी पाणीपुरवठा योजनेतून जालना शहरातील सुमारे ४ लाख नागरिकांसाठी दररोज २० एमएलडी तर अंबडमधील ३१ हजार ५२१ नागरिकांसाठी दररोज २ एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र, भविष्यात वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन योजनेची क्षमता तब्बल ६५ एमएलडी ठेवण्यात आलेली आहे. म्हणजेच भविष्यात जालना व अंबड या दोन्ही शहरांची लोकसंख्या आजच्या साडेचार पट वाढली तरीही या योजनेतुन पाणीपुरवठा करता येऊ शकेल. अंबड शहरातील मत्स्योदरी देवी मंदिराच्या पायथ्याशी तयार केलेल्या जलशुध्दीकरण केंद्रात शुध्द झालेले पाणी जालना शहराकडे पाठविण्यासाठी पंपहाऊसची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामध्ये मोठ्या क्षमतेचे सहा पंप बसविण्यात आले आहेत. सध्या यापैकी केवळ दोन पंप सुरु असून, उर्वरित चार पंप तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत. केंद्राला असलेले कुंपण तुटलेले असून, पूर्णपणे निरुपयोगी झालेले आहे. त्यामुळे जलशुध्दीकरण केंद्रात सर्व दिशांनी प्रवेश करता येतो. जलशुध्दीकरण केंद्राला काटेरी झुडपांचा वेढा पडला आहे. या केंद्रावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने ‘आओ-जाओ घर तुम्हारा’ कशी अवस्था झालेली आहे. कोणत्याही व्यक्तीला कोठेही जाण्यास याठिकाणी मुभा आहे. शहरातील नागरिक या केंद्रात येऊन हवे तेव्हा शुध्दीकरण केलेले पाणी घेऊन जातात, यासाठी विशेष नळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. विशेष धक्कादायक बाब म्हणजे ज्याठिकाणी जलशुध्दीकरण करण्यात येते त्याठिकाणी जाऊन सदर प्रतिनिधीने जाऊन सहजरीत्या छायाचित्रे काढली. ज्या ठिकाणाहून सव्वाचार लाख लोकांना पिण्याचे पाणी पुरविण्यात येते, अशा महत्वाच्या ठिकाणी एवढी बेपर्वाई कशी असू शकते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जालना आणि अंबड शहरातील जवळपास साडेचार लाख नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे.
जलशुद्धीकरण केंद्राची सुरक्षा वाऱ्यावर...!
By admin | Updated: March 14, 2016 00:35 IST