गल्ले बोरगांव : पाणी हे सर्वांगीण विकासाचे प्रमुख साधन असून शाश्वत विकासासाठी पाण्याचे काटेकोर व शाश्वत नियोजन करणे, ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन परभणी कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके यांनी केले.
जागतिक जलदिनानिमित्त, सोमवारी (दि.२२) वनामकृवि परभणी व कृषि विज्ञान केंद्र औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘शेतीच्या पाण्याचे नियोजन : काळाची गरज’ या विषयावर जिल्हाभरातील शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली. यात प्रसंगी ते बोलत होते. शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे डॉ. खोडके यांनी निरसन केले.
पुढे बोलताना डॉ. खोडके म्हणाले की, जगाच्या तुलनेत भारतात फक्त ४ टक्के स्वच्छ पाण्याची उपलब्धता आहे. परंतु भारताच्या लोकसंख्येचा विचार करता आपल्याला हे पाणी कमी पडणार आहे. परिणामी पाण्याचे सूक्ष्म नियोजन करणे काळाची गरज आहे. प्रतिव्यक्ती १२५ ते १५० लिटर पाणी दररोज लागते. सूक्ष्म नियोजन करून हा वापर प्रतिव्यक्ती प्रतिदिन ७५ लिटर आणणेे शक्य आहे. पाण्याचे संवर्धन व बचत करणे ही काळाची गरज आहे. शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचे नियोजन करताना त्यांनी अनेक पैलूंची माहिती दिली. या ऑनलाईन कार्यशाळेत डॉ. देवराव देवसरकर, केव्हीकेचे किशोर झाडे, विषय विशेषज्ज्ञ डॉ. बसवराज पिसुरे, डॉ. अनिता जिंतूरकर, प्रा. गीता यादव, प्रा. अशोक निर्वळ यांचा समावेश होता.