दिनेश गुळवे , बीड गेवराई तालुक्यातील तलवडा परिसरातील बहुतांश जमीन माळरानाची व ओसाड. यामुळे शेतकर्यांना कष्ट करूनही उत्पन्न निघत नसे. आता मात्र शेतकरी या माळरानाच्या जमिनीत गाळ टाकून माळरान फुलवित आहेत. यावर्षी तब्बल तीन हजार एकरवर शेतकर्यांनी तलवाडा तलावातील गाळ टाकला आहे. यामुळे ओसाड जमीन सुपीक झाली आहे. गतवर्षी बीड जिल्ह्यात मोठा दुष्काळ पडला होता. या आपत्तीकडे प्रशासनासह शेतकर्यांनी संधी म्हणून पाहिले. जिल्ह्यातील अनेक तलाव तीस ते चाळीस वर्षापासून गाळाने खचाखच भरले होते. यामुळे तलावाचे क्षेत्र मोठे असले तरी सिंचन होत नव्हते तसेच या गाळामुळे तयार झालेल्या जमिनीवर अनेकांनी शेती कसण्यास सुुरुवात केली होती. गेल्यावर्षी दुष्काळात सर्वच तलाव कोरडेठाक पडले होते. यावेळी प्रशासनाने लोकसहभागातून तब्बल ११७ प्रकल्पातील १ कोटी ब्रास गाळ काढला. या गाळामुळे अनेकांची माळरानाची जमीन सुपीक झाली. गेल्यावर्षी तलवाडा येथे अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या उपस्थितीत गाळ काढण्यास सुरुवात झाली. त्यावेळी शेतकर्यांना हा गाळ शेतात टाकण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. यानंतर अनेक शेतकर्यांनी आपल्या शेतात गाळ टाकला. परिणामी तलवाडा तलावात पाणीसाठा तर मोठ्या प्रमाणावर झालाच शिवाय शेतकर्यांच्या उत्पादनातही वाढ झाली. यावर्षीही तलवाडा तलावातून गाळ काढण्यास प्रशासन प्रोत्साहन देत आहे. यामुळे शेतकरी स्वखर्चातून आपल्या जमिनीत गाळ टाकत आहेत. या कामाची रविवारी अप्पर जिल्हाधिकारी टाकसाळे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी अनेक शेतकर्यांशी संवादही साधला. यावर्षी तब्बल तीन हजार एकरवर शेतकर्यांनी गाळ टाकला असल्याचे त्यांनी सांगितले. या तलावातील गाळ काढण्यास काही अडचणी येत आहेत का? कोणी मनाई करीत आहे का? याची विचारणाही यावेळी त्यांनी शेतकर्यांकडे केली. तसेच प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकरी कशा पद्धतीने गाळ टाकत आहेत, याची पाहणीही केली. बारवाला मुबलक पाणी तलवाडा येथील बारव उन्हाळा लागताच कोरडाठाक पडत होता. गेल्यावषी तलवाडा तलावातील गाळ काढल्याने येथे मोठ्या प्रमाणात सिंचन झाले. परिणामी परिसरातील बारव, विहिरी, कूपनलिका यांचीही पाणीपातळी वाढली. आता कडक उन्हाळा असला तरी येथील तलावाला मुबलक पाणी आहे. यावर्षी गावात पाणीटॅँकरचीही गरज भासली नसल्याचे अंकुश थोरात, योगेश नरसाळे यांनी सांगितले. गाळाने जमीन सुपीक करावी शेतामध्ये तलावातील गाळ टाकल्यास माळरान, मुरमाड असलेल्या जमिनीचा पोत सुधारतो. तलवातील गाळ काढल्यामुळे तलावामध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी साचते शिवाय पाण्याचा निचराही मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे परिसरातील पाणीप्रश्नही मिटतो. गाळ टाकलेली जमीन चिबडत नाही तसेच येथे तन, गवतही कमी प्रमाणात उगते. गाळामुळे जमिनीची उत्पादकताही वाढते. यामुळे शेतकर्यांनी मोठ्याप्रमाणावर तलावातील गाळ जमिनीत टाकावा, असे अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी सांगितले. उत्पादनात झाली वाढ तलवाडा परिसरातील अनेक शेतकर्यांनी गेल्यावर्षी शेतात गाळ टाकला होता. यानंतर अनेकांनी फळबाग केल्या तर काहींनी कपाशीचे पीक घेतले. ज्या मुरमाड जमिनीत एकरी पाच क्विंटलही कापूस होत नव्हता, तेथे गाळ टाकल्यानंतर वीस क्विंटल कापूस निघाल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते शाम कुंड यांनी सांगितले.
गेवराई तालुक्यातील ओसाड जमीन बनली सुपीक
By admin | Updated: May 26, 2014 00:23 IST