सिल्लोड : औरंगाबाद-जळगाव रस्त्यावरील डोंगरगाव फाट्याजवळ शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने एका दुचाकीस्वारास जोराची धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीवरील दोघांपैकी एकाचा उपचारादरम्यान औरंगाबादच्या घाटीत मृत्यू झाला. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अतुल अशोक आडगावकर (वय ३०) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर काशिनाथ भोंबे (३२, रा. आडगाव भोंबे, ता. भोकरदन) यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत.
अतुल व काशिनाथ हे दुचाकीवरून गावाकडे (आडगाव भोंबे) जात होते. डोंगरगाव फाट्याजवळ दुचाकीस्वारांना एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना तत्काळ सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दोघेही गंभीर जखमी असल्याने प्राथमिक उपचार करून डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद घाटी रुग्णालयात पाठविले.
अतुल आडगावकर या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर काशिनाथ भोंबेंवर उपचार सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण बिडवे करीत आहेत.
-------
गुन्हे दाखल होऊनही परिणाम नाही
औरंगाबाद-जळगाव रस्त्याचे काम गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे अपघात सत्र सुरूच आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये सिल्लोड तालुक्यातील रहिमाबादचे दोन भाऊ अपघातात ठार झाले होते. यानंतर मृतांच्या वडिलांच्या तक्रारीवरून जळगाव-औरंगाबाद रस्त्याचे काम करणाऱ्या गुत्तेदार व अभियंत्याविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तरी त्याचा काही परिणाम झालेला नसून, रस्त्याची स्थिती ‘जैसे थे’ आहे. आणखी किती बळी घेतल्यावर संबंधित यंत्रणा जागी होणार हे मात्र देवच जाणे.