आशपाक पठाण, लातूरलातूर : शहरातील वाहतुकीची कोंडी नेहमीचीच बाब बनलेली आह़े़ वाहतूक शाखेचे पोलिस वाहतूक कोंडी दूर करण्यापेक्षा खटले देण्यात मग्न असल्याने गैरसोय वाढली आहे़ बेशिस्तपणे जाणाऱ्या वाहनचालकांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे ‘लोकमत’ने सोमवारी स्टिंग आॅपरेशन करून उघडकीस आणले़ ‘वाहनधारक अन् पोलिसही बिनधास्त’असे वृत्त प्रकाशित करताच वाहतूक शाखेला जाग आली आहे़ मंगळवारी लातूर शहरात बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्या ८७ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे़ तर १०० ते १२५ जणांना समज देऊन सोडून देण्यात आले आहे़ सिग्नल दुरूस्तीकडे मनपाने दुर्लक्ष केल्याने ती समस्या कायम आहे़लातूर शहरातील प्रमुख मार्गांवर असलेले सिग्नल बंद पडल्याने वाहतूक पोलिस आणि वाहनधारकही बिनधास्त आहेत़ पाच नंबर चौक, रेणापूर नाका, नंदी स्टॉप, आदर्श कॉलनी चौक, गुळ मार्केट येथील सिग्नल बंद पडले आहेत़ याठिकाणी वाहतूक सुरळीत करण्याचे काम करीत असलेले वाहतूक शाखेचे पोलिस भलत्याच कामाला लागल्याचे स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले आहे़ त्यामुळे मंगळवारी प्रमुख चौकात वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या शिट्ट्यांचा आवाज वाढला होता़ शिवाजी चौकात वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी वाहतूक शाखेचे पोलिस आॅटोरिक्षा चालकांना तंबी देत होते़ शिवाय, गुळ मार्केट चौकातही वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरू होता़ चौकाचौकात थांबलेले पोलीस सतर्कतेने कामाला लागले होते़ लोकमत चमूने सोमवारी शहरातील चौकाचौकात असलेले सिग्नल व तेथील वाहतूक शाखेच्या पोलिसांचे स्टिंग केल्याची माहिती सायंकाळी वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षकाला लागली़ त्यामुळे त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत विचारणा करून घेतली़ काही कर्मचाऱ्यांची मोबाईलवरच कानउघडणी करण्यात आली आहे़ केसेसचे टार्गेट पुर्ण करण्याच्या नादात वाहतुकीकडे दुर्लक्ष होत असल्याची कबुली कर्मचाऱ्यांतून देण्यात येत आहे़ मात्र, वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षकांनी याचा इन्कार करीत कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगितले़ बेशिस्तपणे वाहन चालविले, वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, सिग्नल तोडणे, भरधाव वेगाने निघालेल्या वाहनचालकांना वाहतूक शाखेच्या पोलिसांनी तंबी दिली़ ८७ वाहनांवर कारवाई करून २१ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे़ गांधी चौकात वाहतूक शाखेच्या पथकाने शेकडो वाहनधारकांना वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी समजही दिली़ कारवाई नेहमीच असते, मात्र वाहनांची वाढती संख्या अपुरे कर्मचारी यामुळे कधी तरी गैरसोय होत असल्याची कबुली वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिली़ लोकमतच्या वृत्ताचे कौतुक करून ज्येष्ठ नागरिक प्रा़ शरदचंद्र डुमणे यांनी वाहनधारकांनाच धारेवर धरले आहे़ ते म्हणाले, आपणास कायदे मोडण्याची सवय आहे़ आपण संवेदना शून्य व इतरांच्या सुरक्षेबाबत अजिबात काळजी घेत नाही़ वाहन चालविण्याची पध्दत कशी आहे, हे विचारात घ्यावे़ दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरणे, चारचाकी वाहनधारकांनी सीटबेल्ट लावे या गोष्टी आपण हसण्यावरी नेतो़ हे चुकीचे आहे़ तुम्ही थांबू शकत नाही, तुम्हाला वेळ नाही, तुम्ही थांबणार नाही असा विचार कराल कराल तर तो अविचार आहे़ काही सेकंदाच्या कालावधीसाठी मोठी रिस्क घेणे म्हणजे तुम्ही अविवेकी असल्याचे सिध्द करता़ तुमचे काही सेकंद वाचविण्याच्या नादात स्वत:बरोबर इतरांच्या जीवाला धोका निर्माण करता़
बेशिस्त वाहनचालकांना पोलिसांची तंबी !
By admin | Updated: December 31, 2014 01:02 IST