गेवराई: येथील तहसीलमधील श्रावणबाळ, संजय गांधी, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना आदींचे अनुदान वितरणात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून तहसीलमधील दोघांना निलंबित करण्यात आले आहे. वयोवृद्ध निराधार व्यक्तींना जगणे सुसह्य व्हावे, आर्थिक चणचण भासू नये, त्यांना आपल्या गरजा भागविता याव्यात व सामाजिक संतुलन राखले जावे, आदी उद्देशाने शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना तसेच इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना राबविल्या जातात. आदी योजनांमधून विधवा, परित्यक्त्या, निराधार यांना महिना ६०० रुपये अनुदान शासनाच्या वतीने देण्यात येते. वंचितांना दर महिन्याला व वेळच्या वेळी अनुदान दिले जावे असा शासनाचा दंडक आहे. असे असले तरी गेवराई तहसीलमधून समाजातील वंचितांना वेळेवर अनुदान दिले जात नाही. लाभार्थ्यांना अनुदान देण्यात तहसीलमधील लाल फितीचा कारभार अडथळा ठरत असल्याचा आरोपही सामाजिक कार्यकर्त्यांतून करण्यात येत होता. यासाठी आंदोलनही झाले होते. एकंदरीत या सर्व बाबींचा विचार करून येथील तहसीलमधील अव्वल कारकून एस.डी. कुलकर्णी व लिपिक एस.एस. पठाण यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९, ३ (१),(२), (३) नुसार कुलकर्णी व पठाण यांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी तडकाफडकी निलंबित केले. सामाजिक अर्थसाह्य योजनेचे अनुदान वितरित करण्यात हलगर्जीपणा केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाने कामचुकार अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.(वार्ताहर)
गेवराई तहसीलमधील दोघे निलंबित
By admin | Updated: June 12, 2014 01:36 IST