तामलवाडी : भरधाव कारला वाचविण्याच्या प्रयत्नात कोळसा वाहतूक करणारा मालट्रक भर रस्त्यावर उलटला. तर कार पुलाच्या कठड्यावर जावून आदळल्याने कारमधील दोघेजण गंभीररित्या जखमी झाले. हा विचित्र अपघात तुळजापूर-सोलापूर रस्त्यावर माळुंब्रा गावानजीक धोकादायक वळणावर शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडला. सोलापूरहून कोळसा घेवून जाणारा ट्रक (क्र. एम.एच. १३ एएक्स २९२९) हा तुळजापूरकडे जात असताना तुळजापूरकडून येणारी कार (क्र. एम.एच. १३ बीएक्स ११८२) अचानक या ट्रकच्या समोर आली. त्यामुळे ट्रकचालकाने कारला चुकविण्याचा प्रयत्न केला असता मालट्रक रस्त्यावर उलटला. तर कार पुलाच्या कठड्यावर जाऊन आदळली. या अपघातात कारमधील दोघेजण जखमी झाले. त्यांना तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. जखमींची नावे उशिरापर्यंत समजू शकली नाहीत. अपघातात कार व मालट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती कळताच तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि मिर्झा बेग, किरण शिंदे, तानाजी माने यांनी घटनास्थळी भेट देवून रस्त्यावर अडकलेली वाहने जेसीबी मशीनच्या मदतीने काढून रस्ता वाहतुकीस मोकळा केला. या अपघाताची नोंद तामलवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे. दरम्यान, माळुंब्रा गावानजीक असलेले धोकादायक वळण हे तीव्र स्वरुपाचे आहे. वाहनांना हे वळण सहज पास होत नाही. त्यामुळे या वळणावर उलटून अपघात होण्याचे प्रमाण कायम आहे. आजवर पुलावरुन ओढ्यात ५ ते ७ वाहने पडली आहेत. तर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. (वार्ताहर)
विचित्र अपघातात दोघे गंभीर जखमी
By admin | Updated: February 8, 2016 00:16 IST