लोकमत न्यूज नेटवर्कसगरोळी (ता. बिलोली): तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शारदानगर-सगरोळी येथे बुधवारी दुपारी तीन वाजता घडली. रात्री उशिरा दोघांचे प्रेत सापडले.क्षितिज बाबू लंके (वय १२, इयता सातवी, रा.रुद्रापूर), प्रमोद संदीप सोनकांबळे (वय १२, इयत्ता सातवी, रा. हंगरगा ता. मुखेड) असे मयत मुलांची नावे आहेत. बुधवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर सेवाग्राम वसतिगृहात दुपारचे जेवण करुन क्षितिज, प्रमोद व त्यांचे दोन मित्र श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या बाजूला असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेले. क्षितिज व प्रमोदला पोहता येत नव्हते. पाण्यात उतरताच ते गटांगळ्या खाऊन बुडून मृत्यू पावले.दरम्यान, सोबतच्या दोन मित्रांनी ही घटना शाळेत येऊन शिक्षकांना सांगितली. शिक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. सगरोळी येथील प्रा. आ. केंद्रात त्यांचे मृतदेह विच्छेदनासाठी पाठविण्यात आले. क्षितिजचे नातेवाईक हजर झाल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.एम. सातमवार यांनी शवविच्छेदन केले. प्रमोदचे नातेवाईक रात्री उशिरापर्यंत पोहोचले नव्हते. पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद घेतली.
दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:53 IST