बिडकीन : पैठण तालुक्यातील बंगला तांडा येथे शेतात काम करणार्या चार मजूर महिलांनी जुन्या माठातील विषारी पाणी प्याल्याने एकीचा त्याच दिवशी मृत्यू झाला होता, तर उपचार सुरू असणार्या तीन महिलांपैकी बुधवारी सकाळी दोन महिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे या विषबाधा प्रकरणातील बळींची संख्या तीनवर गेली आहे. दि. २३ मे रोजी नाना भालेकर यांच्या शेतात ही घटना घडली होती. ज्या महिलांनी या माठातील पाणी पिले होते, तो माठ जुना होता, तसेच कीटकनाशक फवारणीसाठी त्या माठाचा वापर झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. पोलिसांनी सदरील माठ तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविला असून अद्याप अहवाल आलेला नाही. तसेच पोलिसांकडे अजूनतरी कुणी तक्रार दिलेली नसल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. हलगर्जीपणा जिवावर बेतला हलगर्जीपणामुळे तीन महिलांना प्राणास मुकावे लागल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेच्या दिवशी पार्वताबाई दुधा राठोड (६५) यांचा मृत्यू झाला होता. आज (बुधवारी) सकाळी औरंगाबाद येथे उपचार सुरू असणार्या तीन महिलांपैकी कमळाबाई दौलत आडे (७०) व कौराबाई देवीदास राठोड (४२, दोन्ही रा. बंगला तांडा) या दोघींचा मृत्यू झाला. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत कमळाबाई यांच्या पश्चात पती, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. तर कौराबाई यांच्या पश्चात पती, दोन मुले, पाच मुली, सासू, सासरे असा मोठा परिवार आहे. कलाबाई शेषराव राठोड यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावरही औरंगाबादमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माठातील विषारी पाण्याने आणखी २ महिलांचा मृत्यू
By admin | Updated: May 29, 2014 01:14 IST