संदीप अंकलकोटे , चाकूर शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर प्रश्न ठरत आहे़ अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने, हातगाडे, रस्त्यावरच थांबत असल्याने पादचाऱ्यांना मार्गही काढणे कठीण झाले आहे़ लातूर-नांदेड हा राज्यमार्ग शहरातूनच असल्याने व वाहतुकीच्या कोंडीमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे़ त्यामुळे सर्वसामान्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़ चाकूर शहरातून ये- जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ त्यामुळे शहरातील प्रत्येक रस्त्यावर सतत वर्दळ असते़ शहरातील चौकाच्या परिसरातील रस्त्यावर हातगाडे, आॅटो, विक्रेते हे थांबत आहेत़ परिणामी, अन्य वाहनधारकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे़ पोलिस अधिकारी- कर्मचारी या रस्त्यावरुनच पोलिस ठाण्याकडे ये- जा करीत असतात़ परंतु, त्यांचे दुर्लक्ष होत आहे. जुन्या बसस्थानक चौकात दोन बँक आहेत. विशेष म्हणजे, या चौकात नो-पार्किंग झोन असतानासुद्धा बेशिस्तपणे येथे वाहने बिनधास्त थांबविली जातात़ या चौकात व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. या दुकानांसमोर हे आॅटो, हातगाडे थांबत असल्याने व्यापाऱ्यांना आपली वाहने उभी करण्यासाठी जागा शिल्लक रहात नाही. बोथी चौकातही बेशिस्त वाहने थांबतात़ या चौकात नो-पार्किंग फलक आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जाते़ पोलिसांनी वाहनधारकांसाठी जागा ठरवून दिली आहे. परंतु, त्याचे उल्लंघन होत आहे़ नवीन बसस्थानकासमोरुन ये- जा करणे ही अडथळ्यांची शर्यतच ठरत आहे़ राज्य मार्गालगतच दुचाकी, चारचाकी वाहनांसह हातगाडे बेशिस्तपणे उभी करण्यात येतात़ त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे़ शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेता नो-पार्किंग झोन, पार्किंग, विनंती थांबा, आॅटो थांबा असे विविध ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. त्याची वाहनधारकांनी अंमलबजावणी केल्यास वाहतूक समस्येचा प्रश्न सुटतो. परंतु, पोलिसांच्या या आदेशाला वाहनधारकांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. ४राज्यमार्गाच्यालगत अतिक्रमणे होत असल्याने वाहनधारकही आपापली वाहने रस्त्यालगतच उभी करीत आहेत. वाळूची टिप्पर भरधाव वेगाने धावतात. त्यामुळे काहीजणांना प्राणासही मुकावे लागले आहे़ वाहतुकीच्या गंभीर प्रश्नावर प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे़ तत्कालिन सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधाकरराव बावकर यांनी दीड वर्षांपूर्वी या समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत व पोलिस ठाण्याच्या विद्यमाने संयुक्त मोहीम राबवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही उपाययोजना आखल्या होत्या. ठिकठिकाणी वाहनांसाठी, आॅटो पार्किंग व्यवस्था करून दिली होती. परंतु, त्यांच्या बदलीनंतर या प्रश्नाकडे कोणीही लक्ष दिले नाही. आठवडी बाजार शुक्रवारचा असतो. यादिवशी गर्दी वाढते. परंतु, बेशिस्त वाहतुकीचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे़
वाहतुकीच्या कोंडीने गुदमरतोय श्वास !
By admin | Updated: March 19, 2015 23:55 IST