औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७ मेच्या रात्री मुंबईहून आलेल्या जेट एअरवेजच्या विमानाच्या हार्ड लँडिंगने प्रवाशांना थरकाप उडविणार्या अनुभवाला तोंड द्यावे लागले. या १५ सेकंदांच्या थरारमध्ये वैमानिकाने आपले कौशल्य पणाला लावून प्रसंगावधान आणि अनुभवाच्या जोरावर तात्काळ विमान नियंत्रणात आणले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मुंबईहून रात्री साडेसातच्या सुमारास आलेल्या जेट एअरवेजचे विमान लँड झाल्याबरोबर पुन्हा हवेत उडून नागमोडी होत धावपट्टीवर गेले. त्यानंतर ते पुन्हा सरळ दिशेने धावले. लँड होताच विमान डाव्या बाजूला झुकले आणि पुन्हा सरळ झाले. जेट एअरवेजच्या प्रशासकीय सूत्रांनुसार तांत्रिक कारणांमुळे विमानाने हार्ड लँडिंग केली. त्यामुळे प्रवाशांना जोरदार हिसका बसला. अशातही विमानाने धावपट्टी सोडली नाही. विमान लँड होताच ब्रेक वापरल्यामुळे अथवा विमानतळावरील रनवे वाढविण्यात आल्यामुळे त्याच्या जोडावर विमान उतरल्याने हा प्रकार झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली. परंतु ठोस कारण मात्र, कोणाकडूनही मिळू शकले नाही. परंतु या घटनेच्या वेळी वैमानिकाचा अनुभव महत्त्वाचा ठरला. अवघ्या १५ सेकंदांच्या घटनेत वेळीच वैमानिकाने विमानावर नियंत्रण मिळविले. विमानाने धावपट्टी सोडली असती तर त्यातून अपघाताची शक्यता अधिक होती. संबंधितांनी वैमानिकाने प्रसंगावधान राखून विमान नियंत्रणात आणल्यामुळे अनर्थ टाळला गेल्याचा दुजोरा दिला. या प्रकरणी वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होईल, याबाबत काही सांगता येणार नाही. तसेच घटनेची चौकशी होण्याची शक्यताही नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामागे दडले काय? या घटनेमुळे चिकलठाणा विमानतळाच्या धावपट्टीची स्थिती, तसेच विमानतळाच्या परिसरात वाढलेल्या वसाहतींमधून रात्री येणारा प्रकाश, यामुळे वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज घेण्यात अडचण येते का ? हा प्रश्न निर्माण होत आहे.
...त्या १५ सेकंदांत लागले वैमानिकाचे कौशल्य पणाला
By admin | Updated: May 9, 2014 00:01 IST