जालना : जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेची वर्षपूर्ती होत नाही तोच नगरपालिकेने पाणीपट्टीत तीन पटींनी वाढ केली आहे. तसेच या पाणीपट्टीची वसुली काटेकोरपणे होण्यासाठी दोन पथकांची स्थापना करण्यात आली असून वसुलीही सुरू करण्यात आली आहे. नवीन जालना भागाला घाणेवाडी जलाशयातून तर जुन्या जालन्याला नवीन जायकवाडी पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या दोन्ही ठिकाणी पाणी असून पालिकेच्या नियोजनाअभावी जालनेकरांना वेळेवर पाणी मिळत नाही. पालिकेकडून जरी अधिकृतपणे आठ दिवसा आड पाणी पाणी पुरवठा केला जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात शहरात १० ते १५ दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. त्यात ही अनेक वेळा जलवाहिनीला गळती लागणे, विद्युत पंप नादुरूस्त होणे, कधी वीज पुरवठा खंडीत करणे आदी अनेक कारणावरून पाणी पुरवठ्यात वारंवार व्यत्यय येतो. फिल्टर बेटचे एक युनिट बंद असल्याने नवीन जालन्याला घाणेवाडीतून होणारा पाणी पुरवठ्याच्या शुद्धीबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. पालिका बिनदिक्कतपणे पिवळसर पाणी नागरिकांच्या माथी मारते. तरीही जनता सहन करते. अशा परिस्थितीत पालिकेने पाणी पट्टीची तीन पट अधिकची रक्कम नागरिकांच्या माथी मारली आहे. सदर योजनेला एक वर्ष पूर्ण होत नाही तोच पाणीपट्टीत तीनपट वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे वसूल पथकातील अधिकारी व कर्मचार्यांपुढे पाणीपट्टी वसूलीचे मोठे आव्हान आहे, अशी चर्चा पालिकेच्या वर्तुळात सुरू आहे. (प्रतिनिधी) पाणी पट्टी वसुलीसाठी नगर पालिकेचे नवीन जालना व जुना जालना साठी दोन पथके तयार केलेली आहेत. पहिल्या पथकात पथक प्रमुख म्हणून कर निरीक्षक बी. आर. गवळी, बी. सी. राठोड, शोएब कुरेशी तर वसुली लिपिक म्हणून जाकेर खान, निलेश शंकरपेल्ली, शेख कादर, वि.धा.पवार, नामदेव म्हस्के, ध. पा. सोनवणे, सुधीर डहाळे, सुरेश गोशिक, सुनील डहाळे, डी.एस.गुप्ता, नितीन खिल्लारे, दत्ता अकोले, शिवाजी भोसले, संतोष निकम, अर्जुन राठोड, बाबूखान अमीरखान, असलम बेग, हितेंद्र आगळे, दत्ता अकोले यांचा समावेश आहे तर दुसर्या पथकात पथक प्रमुख म्हणुन यू.आर.बगळे, कर निरीक्षक विनोद कुरील, श्रीकिशन मुंगसे, तर वसुली लिपिक म्हणूनमो. अमजदखान, आनंद हजारे, काकासाहेब नाईकवाडे, तेजेंद्र मेहरा, फेरोज बेग, अनिल वानखेडे, अमृत जैस्वाल, सतीश पांगजे, अर्जुन गोरे, किशन मुंगसे, सुनील हर्सूलकर, सुरेश कांबळे यांचा समावेश आहे.. जालना शहरात नागरिकांना पूर्वी पाणी पट्टीचे वार्षिक ८०६ रूपये होते. आता ती २७०० रूपये करण्यात आली आहे. म्हणजेच त्यात तीनपटीपक्षा जास्त वाढ केली. त्यामुळे नागरिकांना भूर्दंड बसणार आहे. ही वाढ रद्द करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून करण्यात येत आहे. जायकवाडी जालना पाणी पुरवठा योजनेवर दरमहा मोठा खर्च होत आहे. देखभाल दुरूस्ती व वीज बिलाचा खर्च लाखोच्या घरात गेलेला आहे. हा खर्च काढण्यासाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत वर्ष भरा पूर्वीच यासंबधी निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी मात्र आता सुरू करण्यात येत असल्याची माहिती कर अधिक्षकांनी दिली.
जालनेकरांच्या माथी तीन पट वाढीव पाणीपट्टी
By admin | Updated: May 23, 2014 00:22 IST