पुरुषोत्तम करवा , माजलगावगणेशचतुर्थीला सर्वच ठिकाणी गणपतीची स्थापना होते. मात्र माजलगाव येथील टेंबे गणपतीची स्थापना निजामकाळापासून भाद्रपद एकादशीला होते. महाराष्ट्रातील या आगळ्यावेगळ्या व नवसाला पावणाऱ्या टेंबे गणपतीने ११४ वर्षांपासून चालत आलेल्या ‘इको फ्रेंडली’ची संकल्पना चालू ठेवली आहे. माजलगाव शहरातील जोशी गल्ली येथे १९०१ साली काही युवकांनी मिळून जोशी गणेश मंडळाची स्थापना केली होती. या गणपतीची गणेश चतुर्थीला स्थापना करण्यात येत होती. गणपतीची स्थापना करण्यात आल्यानंतर एका महिलेने संतती होत नसल्यामुळे या गणपतीला नवस करुन माझ्या वंशाला दिवा मिळाल्यास गणपतीसमोर टेंबा लावील, अशा प्रकारचा नवस केला व तिला एका वर्षातच मूल झाले. तिने आपला नवस फेडण्यासाठी गणपतीला टेंबा अर्पण केला. तेंव्हापासून या गणपतीस नवसाला पावणारा ‘टेंबे गणपती’ असे नाव पडले आहे. निजाम राजवटीत कोणताही सण साजरा करण्यासाठी रजाकारांची परवानगी लागत असे. गणेश चतुर्थीला टेंबे गणपतीच्या सदस्यांनी रजाकारांची स्थापनेसाठी परवानगी न घेता मिरवणूक काढली. यावेळी ही मिरवणूक अडविण्यात आली व त्यांना स्थापनेचा परवाना मागितला. परंतु या मंडळाकडे परवाना नसल्याने काही सदस्य परवाना आणण्यासाठी हैदराबादला गेले. स्थापनेचा परवाना आणला. तोपर्यंत तीन-चार दिवस निघून गेले. यामुळे भाद्रपद एकादशीला या गणपतीची स्थापना करण्यात आली व याचे विसर्जन प्रतिपदेला करण्यात येऊ लागले. त्यामुळे कधी पाच तर कधी सहा दिवसांचा हा गणपती बसविण्यात येतो. राज्यात सर्वत्र प्लास्टर आॅफ पॅरिसपासून बनविलेल्या गणपतीची स्थापना मंडळाचे कार्यकर्ते करू लागले. मात्र या गणेश मंडळाने ७ ते ८ फुटाची मूर्ती शेणा, मातीपासून बनविली आहे. पापादेव गोंदीकर, बाळू कोथाळकर यांनी १५ दिवसांत ही मूर्ती बनविली. मंगळवारी याचे विसर्जन होणार असल्याचे पुजारी उदय जोशी, अध्यक्ष किशोर जोशी यांनी सांगितले.
११४ वर्षांची परंपरा जोपासणारा टेंबे गणपती
By admin | Updated: September 5, 2014 00:57 IST