राजू वैष्णव , सिल्लोडछोट्या-छोट्या कारणावरून उद्भवणाऱ्या वादाच्या तक्रारींवरून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येत असल्याने तंटामुक्त गाव समित्या कागदोपत्रीच आहेत. शासनाच्या तंटामुक्त गाव अभियानाला पोलिसांकडूनच छेद दिला जात असल्याने महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या कुचकामी ठरत आहेत. गावातील सर्व समाजाने गुण्यागोविंदाने राहावे, आपापसातील तंटे गावपातळीवर मिटवून गावात शांतता नांदावी, यासाठी राज्य शासनाने तंटामुक्त गाव समिती अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत दरवर्षी दि.१५ आॅगस्टला गावपातळीवर तंटामुक्त गाव समिती गठित केली जाते. या समितीमध्ये सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, माजी सैनिक, शिक्षक, पदवीधर तरुण, वकील, पत्रकार आदींची निवड केली जाते. या अभियानांतर्गत गावातील तंटे गावात मिटवून व सर्व धार्मिक उत्सव शांततेत पार पाडणाऱ्या गावांना लोकसंख्येनुसार बक्षीस दिले जाते. सुरुवातीला या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक वर्षांपासून न्यायप्रविष्ट असलेली प्रकरणे सामंजस्याने आपापसात समेट घडवून निकाली काढण्यात आली. अनेक गावांना तंटामुक्त गावाचे बक्षीस मिळाले. यातून गावकऱ्यांनी गावात विकास कामे करून घेतली; परंतु गेल्या एक-दोन वर्षांपासून तंटामुक्त गाव समित्या कागदोपत्रीच आहेत. छोट्या-छोट्या परस्परविरोधी तक्रारींवरून पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात येत आहे. यामुळे पोलिसांना दोन्ही गटांतील फिर्यादी आरोपींकडून चिरीमिरी मिळते. चिरीमिरी मिळविण्यासाठी पोलिसांकडून तक्रारीची शहानिशा न करता गुन्हा नोंदविण्यात येत आहे. यामुळे छोट्या-छोट्या कारणावरील वादाची मनात सल राहून पुढे या वादांना खतपाणी मिळते. गावातील तंटे गावात मिटविण्यासाठी पोलिसांनीही सकारात्मक भूमिका घेणे गरजेचे आहे, तरच शासनाने सुरू केलेले महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान यशस्वी होईल. समिती अध्यक्षांना तक्रारींची माहिती देणे गरजेचेछोट्या-छोट्या कारणावरून उद्भवणाऱ्या वादांच्या तक्रारींवरून सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येत आहे. छोट्या-छोट्या कारणांवरून ठाण्यात येणाऱ्या तक्रारींची माहिती सदरील गावातील तंटामुक्त अध्यक्षांना दिली पाहिजे, जेणेकरून सदर तंटा गावात सामंजस्याने मिटवता येईल. यामुळे दोन्हीकडील तक्रारदारांमध्ये समेट घडवून आपापसातील क्षुल्लक कारणावरील गैरसमज दूर होतील. गावपातळीवर तंटा न मिटल्यास त्यानंतर ठाण्यात गुन्हा नोंदवावा. यामुळे छोट्या-छोट्या तक्रारी पोलीस ठाण्यात येणार नाहीत; परंतु पोलिसांना यामध्ये स्वारस्य नाही.
तंटामुक्त गाव समित्या फक्त कागदोपत्रीच
By admin | Updated: June 10, 2014 00:59 IST