औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. आतापर्यंत विभागातील पाच जिल्ह्यांत पाणीपुरवठ्याचे टँकर सुरू झाले आहेत. सध्या विभागातील तीनशे गावांना २०९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ८२ टँकर सुरू आहेत. मराठवाड्यात समाधानकारक पाऊस होऊनही यंदा पाणीटंचाई भासू लागली आहे. फेबु्रवारीपासूनच औरंगाबाद जिल्ह्यातील काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. मात्र आता मे महिना सुरू होताच टंचाईची तीव्रता वाढली आहे. एप्रिलअखेरपर्यंत औरंगाबादसह बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात टँकर सुरू करावे लागले होते. आता नांदेड आणि जालना जिल्ह्यातही टँकरला सुरुवात झाली आहे. सध्या मराठवाड्यात १६४ गावे आणि १३४ वाड्यांना २०९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय विभागात अनेक ठिकाणी विहीर अधिग्रहित करूनही पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात १६०, जालना जिल्ह्यात २, बीड जिल्ह्यात ६६, उस्मानाबाद जिल्ह्यात ८५, नांदेड जिल्ह्यात ३ अशा एकूण ३१६ विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. मागील आठवड्यात विभागात १४९ टँकर सुरू होते. चालू आठवड्यात ही संख्या ६० ने वाढली आहे. जिल्हाटँकर औरंगाबाद८२ जालना२ नांदेड३ बीड७३ उस्मानाबाद४९ एकूण२०९
टँकरने ओलांडला दोनशेचा आकडा
By admin | Updated: May 8, 2014 23:58 IST