औरंगाबाद - शहरात साथरोगांची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. ऋतूनुसार पावसाळा लागला आहे; मात्र पावसाने दडी मारलेली असली तरी कूलर, डबकी व साठवलेल्या स्वच्छ पाण्यातील डासांची पैदास वाढल्यामुळे तापाचे रुग्ण दवाखान्यांतून दिसून येत आहेत. शहानूरवाडी परिसर, रेल्वेगेटजवळील ओमप्रकाश अंबादास मोरे या दोनवर्षीय मुलाला एका खाजगी रुग्णालयात काल ११ रोजी ताप आल्यामुळे दाखल केले आहे. सदरील रुग्णालयाने ओमप्रकाशला डेंग्यू नसल्याचा अहवाल पालिकेला दिला आहे. त्यामुळे त्याला डेंग्यूचे लक्षण नसल्याचा दावा मनपा आरोग्य विभागाने केला आहे. मुकुंदवाडी, अंबिकानगर, राजीव गांधीनगर, जयभवानीनगर, एन-५, साईनगर, न्यू हनुमाननगर, कटकटगेट, फाजलपूर, हर्षनगर, गांधीनगर, जाफरगेट, खोकडपुरा, गरमपाणी, नौबत दरवाजा या भागात नाल्यांमुळे डासांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. मनपाने नालेसफाई तातडीने करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. डासांमुळे होणारे आजारडासांमुळे हिवताप, डेंग्यू, चिकुन गुनिया हे आजार होतात. अॅनाप्लेक्स डासामुळे हिवताप येतो. इजिप्टाय हा डास चावल्यास डेंग्यू व चिकुन गुनिया होतो. फ्युलेक्स हा डास चावल्यास हत्तीरोग होतो. पुढच्या आठवड्यात जनजागृतीसाठी मनपा प्रदर्शन भरवून डास, गप्पी माशांचे महत्त्व नागरिकांना पटवून सांगणार आहे. तसेच पावसाळ्यात खबरदारी म्हणून उपाययोजनांची माहितीही देणार आहे, असे मलेरिया विभाग अधिकारी शे. युनूस यांनी सांगितले. नागरिकांनी काळजी घ्यावी...आठवड्यातून एकदा भांडी स्वच्छ धुऊन कोरडी करून गाळून पाणी भरावे. स्वच्छ पाणी झाकून ठेवावे. डासविरोधी साधनांचा वापर करावा. घर स्वच्छ ठेवावे. परिसरात वाढलेले गवत, झुडपे कापून टाकावीत, असे आवाहन मनपाने केले आहे. आजाराची लक्षणेतीव्र ताप येणे, डोकेदुखी, मळमळ, उलटी, सांधे व अंगदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, क्वचित पुरळ येणे ही डेंग्यूची, तर थंडी वाजून येणे, सतत किंवा दिवसाआड ताप येणे, घाम येऊन अंग गार पडणे, डोके दुखणे, उलट्या होणे ही हिवतापाची लक्षणे आहेत.
साथरोगांची लक्षणे; रुग्णांत झाली वाढ
By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST