जालना : तालुक्यातील खरपुडी येथील एका ५० वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली. शेषराव सखाराम शेजूळ असे त्यांचे नाव आहे. घरा समोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत गुरूवारी सकाळी आढळून आले. याबाबत राजू किसनराव वायाळ यांनी तालुका जालना पोलिसांना माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविले. याप्रकरणी तालुका जालना पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक चपटे हे करीत आहेत. दरम्यान, शेजूळ यांच्या आत्महत्ये मागचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आ. अर्जुन खोतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, उपजिल्हाप्रमुख पंडित भुतेकर, तालुका प्रमुख संतोष मोहिते आदींनी शेजूळ कुंटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. (वार्ताहर)शेषराव शेजूळ यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. मुलीचे लग्न कसे करावे या चिंतेने ते ग्रासले होते. १३ जानेवारी रोजी त्यांनी वैफल्यग्रस्त अवस्थेत गावातील काही जणांना भेटून माझा मौतीला या बर का? असे उदगार काढून काहींच्या पाय सुद्धा पडले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
खरपुडीत इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
By admin | Updated: January 15, 2016 00:16 IST