अंबाजोगाई: अंबाजोगाई व परिसरात केशरी कार्डधारकांना गेल्या पाच महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तू व धान्य पुरवठा मिळत नसल्याने याचा मोठा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. अंबाजोगाई शहर व परिसरात गेल्या पाच महिन्यांपासून केशरी कार्डधारकांना पुरवठा विभागाच्या वतीने पुरवण्यात येणार्या गहू, तांदूळ, साखर, तेल इ. वस्तूंचा पुरवठा होत होता. मात्र, हा पुरवठा अचानकच बंद झाला. परिणामी या ग्राहकांना बाजारातून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी निमूटपणे करावी लागत आहे. वाढत्या महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना आधार ठरणारी ही योजना निकामी झाल्याने ग्राहक त्रस्त आहेत. या ग्राहकांना तात्काळ केशरी शिधापत्रिकेवर धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मानवलोक जनसहयोगचे डॉ. द्वारकादास लोहिया, शाम सरवदे, संजना आपेट, सावित्री सगरे यांनी तहसीलदारांकडे केली आहे. या संदर्भात अंबाजोगाईचे तहसीलदार राहुल पाटील यांच्याकडे विचारणा केली असता जिल्हा पुरवठा विभागाकडूनच पुरवठा न झाल्याने केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य देता आले नाही. या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा सुरु असल्याचे राहुल पाटील म्हणाले. (वार्ताहर)
पाच महिन्यांपासून केशरी कार्डधारकांना धान्यपुरवठा बंद
By admin | Updated: May 27, 2014 00:56 IST