नळदुर्ग : राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करण्यात आलेल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना एकरी ६० लाख रुपये मावेजा द्यावा व प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देऊन नोकऱ्या द्याव्यात यासह आदी मागण्यांसाठी सोमवारी उमरगा, लोहारा, तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अणदूर येथे रास्ता रोको केला. सोलापूर ते मच्छलीपटनम या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ चे चौपदरीकरणाचे काम चालू असून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाने शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या असून, त्यांना वेगवेगळ्या दराने मावेजा दिलेला आहे. तुळजापूर-उमरगा व लोहारा तालुक्यातील सुमारे ६८० शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गाच्या चौपदरीकरणात गेल्या आहेत. तुळजापूर-उमरगा व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी अणदूर येथे दुपारी बारा वाजता रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी जवळपास २ तास वाहतूक ठप्प झाली होती. शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक अरविंद घोडके यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन अमोल गुड्ड तर आभार प्रदर्शन बस्वराज मुळे यांनी केले. यावेळी दीपक घोडके, वसंत वडगावे, शिवदास कांबळे, शिवाजी कांबळे व सयाजीराव देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. निवेदनाची प्रत भूसंपादन कार्यालयातील जोशी, नायब तहसीलदार जाधव, निरीक्षक अमर बोगीले व सपोनि एम. वाय. डांगे यांना दिले. यावेळी सपोनि डांगे यांनी बंदोबस्त ठेऊन आंदोलनस्थळापासून अर्धा किमी अंतरावर वाहने रोखली होती. (वार्ताहर)
मावेजासाठी रास्ता रोको आंदोलन
By admin | Updated: January 13, 2015 00:12 IST