जालना: जुना जालना भागावर दहा दिवसांपासून असलेले जलसंकट अजून, चार दिवस कायम राहणार आहे. जायकवाडी ते जालना दरम्यान दुरूस्त केली जलवाहिनी तसेच व्हॉल्व्ह पुन्हा निकामी झाल्याने पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी कळविले आहे. नऊ फेब्रुवारी रोजी जायकवाडी ते जालना जलवाहिनी दुरूस्तीसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आला. तीन दिवसांत काम पूर्ण होईल असे सांगण्यात आले. मात्र, तांत्रिक कारणांमुळे आठ दिवसांनंतरही पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही. अंबड ते पाचोड मार्गावरील रहाटगावाजवळील व्हॉल्व्ह रविवारी दुरूस्त करण्यात आला. दोन ते तीन दिवस काँक्रिटचे काम सुकण्यासाठी गेले. सोमवारी पाणी पुरवठा होईल, असे अपेक्षित होते. मंगळवारी दुपारपर्यंत पाणी येईल असे पालिकेकडून सांगण्यात आले. मंगळवारी दुपारी व्हॉल्व्ह पुन्हा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. दुपारनंतर पाणी बंद करून व्हॉल्व्ह दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. हे काम पुढील चार दिवस सुरू राहणार आहे. पालिकेने चार दिवसांचा अवधी दिला असला तरी प्रत्यक्षात आठवडा लागण्याची चिन्हे आहेत. एकूणच जुना जालना भागाला पंधरा ते वीस दिवसांनी पाणी मिळणार आहे. दहा दिवसांपासून पाणी नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पाणी कोठून आणावे असा संतप्त सवाल नागरिक व्यक्त करीत आहेत. मंगळवारी पाणी येणार असल्याने अनेकांनी दिवसभर पाण्याची प्रतीक्षा केली. मात्र, पाणीपुरवठा न झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दहा ते बारा दिवसांपासून गांधीचमन, संजय नगर, दु:खीनगर, भाग्यनगर, गोकुळनगर, मोतीबाग परिसर कचेरी रोड, गवळी मोहल्ला, नूतन वसाहत मंमादेवी नगर, लहुजीनगर, समर्थनगर आदी अनेक भागांत पाणीपुरवठा झालेला नाही. रस्त्यांची कामे सुरू असल्याने नागरिकांना टँकरने पाणी आणणे जिकिरीचे झाले आहे. प्रत्येक कुटुंबाकडे कूपनलिका नाही. त्यामुळे काही भागात नगर पालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नगारिकांतून होत आहे. पुढील चार ते पाच दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांतून चिंता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
जुन्या जालन्यावर जलसंकट कायम
By admin | Updated: February 22, 2017 00:04 IST